नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday 4 December 2018

मराठी कविता - Poetry

काळोखाच्या गाभारी
माया
मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)
लव्ह ट्रँगल
जगणं
तू गेल्यावरती कळले
पिंपळपान
सृष्टीचे कोडे
नाही भेटलीस तरी ........
रहाट
ती सध्या काय करते?
त्रिवेणी
शंकर बार
पाऊस
नोटा
समांतर
मीच का ?
गुढी
लिहितो मी
शर्यतीतुन
शीर्षक
कायी माय
मोबाईल
झाडावर पाखरू बसलं : लावणी
सांगा
ये तू मैदानात : शेतकरी गीत
दुर्बोध कविता
मुलगा
परतून ये तू घरी
हात चांदण्याचे
तूरडाळ टंचाई
सावळा-सावळा
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
पाघोळ्या .....
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल
हायकू -
लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका
कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!
ऐश ट्रे!
स्तंभ
गर्भपातल्या रानी .....!
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -
हसत जीवन जगून तर बघ...
फुटावे हे भांडे आता
भाजी जळली
ओंजळ
गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा
नि:शब्द हो, कविते
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
मैत्री
शिंपले
बोलण्यापुरतीच उरले बोलण्याचे
अश्रू का गळतात.........?
सांगा असतो का कधी मी माझा?
मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
आठवणींचे बेसूर
ऋणानुबंध
प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...
अजुनी बसून आहे
बांद्रा स्टेशन बाहेर.....
गीत (सांज)
तुझ्या हास्याचे तुषार ...
रोजचे झाले
खरच मी स्वप्नाला भितो
त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)
पत्र
पैसा येतो आणिक जातो
अबोल
मेलेल्या वाटेला
कडवट असतात काही क्षण
गर्वानं सांगतो
बाँम्बस्फोट
दावण
शेती
तुकडे
मायावी श्रावण
जीवन
काजळ घातलेले डोळे
फेसबुकवरील प्रेम
निसर्गकन्या : लावणी
असा पाउस झडला
थेंबघुंगरु
ओल....
आस ही मूर्त झाली
दुःख माझे
येड...
पावसाच्या सरी
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका
वारी
सहवास........
॥ पंढरी ॥
१) अरे पावसा पावसा २ ) टगेगिरी
मरे एक मुंगी
नथीचा आकडा
जीवनखुणा...
तू कापसाप्रमाणे झालास हल्ली टल्ली!
विकास गड्यांनो विकास
अश्याच एका मदर्स डे ला
नवा पुरोहित
पॉवरफुल बाबा
आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -
लाटणे सोबती सोडीना ती पाठ -
ट्राफिक
तोच चेहरा
मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -
भरल्या पोटाची कविता
तमातून तमाकडे….
जार फुलांचा गंध
एसएससी
वसंताची चाहुल
रणधुमाळी तीच अन्‌‍ त्याच आरोळ्या पुन्हा
प्रीतीची पारंबी
घाव कधीही
तुमच्या-आमच्यासठी कुणी......
चैत्राची चाहूल
लोकशाहीचा सांगावा
गीत तिचे गातांना
पैसा ओत
संगत
सांजवातीस थांबला...
श्रीज्ञानेश्वरी गौरव
आज चवताळली माझी भूक आहे
सूर्य थकला आहे
वेगळा
बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या......
रंग आणखी मळतो आहे


काळोखाच्या गाभारी
भग्नं राऊळी - उभी सावळी ।
देवरायाची मूर्त आगळी ।
कुणी प्रवासी, न वाटसरूही ।
विसावलेला तिथे जरी ॥

नसे धूप अन नसे आरती ।
वेदमंत्र ना पूजा पठण ।
दर्वळत नाहीत पुष्पमाळा ।
ना किणकिणती पण नाजूक कंकण ॥

गर्द तरूंच्या छायेमध्ये ।
कळस जरासा उगीच चमके ।
फडफडत्या पंखांची नक्षी ।
कधी नभावर अलगद उमटे ॥

सूर्यबिंब ढळे अस्ताचली ।
वेढून घेती संध्याछाया ।
रानोमाळी दाटून येई ।
भय जागवी काजळमाया ॥

दूरदूरच्या नील नभावरी ।
शुभ्र चांदणी चमके न्यारी ।
कुणी अनामिक ठेवून गेला ।
एकच पणती या गाभारी ॥ 

माया

निर्जन अंधाऱ्या
    पायवाटेवर
अडखळले होते
पाऊल जेव्हा
मनोमनी गुंजत होती
फक्त तुझीच
आश्वासक साद ॥

काजळलेल्या दिशांतून
कोंदटलेल्या अवकाशात
अनोळखी मार्ग शोधताना
आधार होता
एकाकी शुभ्रप्रकाशी
तेजाळलेल्या ताऱ्याचा ॥

बेदरकार वाऱ्याने
उन्मळून पडलेले
विराट वृक्ष पाहताना
कोवळ्या दुर्बळ तृणपात्यांनी
सोडली नव्हती
कधीच साथ ॥

म्हणून तर ...
या वादळवाऱ्यात
आणि अनावर कोलाहलात,
 संपत नाहीये अजूनही
    माझे असणे
ही तर तुझीच माया - ॥

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!

स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!

माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!

तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!

वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!

लव्ह ट्रँगल
हिच्यासाठी झुरू की तिच्यासाठी उरू
कोणासाठी किती आणि काय काय करू

पिझ्झासाठी तिचा बाळहट्ट
पोळीभाजीशी हिची मैत्री घट्ट
आपलं काय, भाजीच टॉपिंग
पिझ्झासोबत खाऊ
कोणासाठी किती आणि काय काय करू

साडी घालताना तिचा चेहरा त्रस्त
हिची काळजी साडी परंपरेचा अस्त
आपलं काय, मोगऱ्याचा छान
सुगंध दोघींना माळू
कोणासाठी किती आणि काय काय करू

तीचं प्रेम, वारा सुसाट बेफाम
हीची माया, वृक्ष थकलेला स्तब्धखोल
आपल काय, कधी झाडाच गर्द हिरवं पान
कधी वाऱ्या बरोबर पाचोळा बनू
कोणासाठी किती आणि काय काय करू

जगणं

एकदा, ते मला रत्स्यात भेटले,

तेव्हा पुसता, काय असते ‘जगणं?

ते मनापासून हसले,


मी तर फक्त आनंद

तो वाटता तर तुम्हीच


मी तर डोळ्यातील आसवे

ती पुसता तर तुम्हीच


मी तर असीम दुःख

ते सहनता तर तुम्हीच


मी तर परंपरागत संस्कार

ते जोपासता तर तुम्हीच


मी तर नुसती नातीगोती

ती जोडता तर तुम्हीच


मी तर केवळ जीवन रे,

ते जगता फक्त तुम्हीच रे.

तू गेल्यावरती कळले
तो सूर नवा ते गाणे,
तो अर्थ ते पाहणे,
ती इच्छा आतील आर्त
स्पर्शास स्वतःचा स्वार्थ...

कळले सारे काही,
तू गेल्यावरती कळले १

तो प्रश्न अन ते उत्तर,
त्या 'नाही'चे भाषांतर,
या नात्याचा परमार्थ
उपमा खळीस सार्थ

सुचले सारे काही,
तू गेल्यावरती सुचले २

ते न येण्याचे कारण
कागदी फुलांचे तोरण
तव चोख हिशोबी स्वत्व
जलपर्णी सम लवचीक तत्त्व

दिसले सारे काही,
तू गेल्यावरती दिसले ३

ती वळणांची मोहकता
ती ओलाव्याची घनता
शब्दांस जे होते रंग
अन सुरांस होते अंग

गेले सारे काही
तू गेल्यावरती गेले ४

ते प्रतारणेचे शल्य
ती ओढ अन ते कैवल्य
स्वप्नांचा सुंदर गाव
खोल आतले भाव

ढळले सारे काही,
तू गेल्यावरती ढळले ५

अपघाताचे क्षण ते
मिलनाचे सारे प्रण ते
त्या शृंगाराच्या वाती
त्या स्पर्श-पुलकित ज्योती

टळले सारे काही
तू गेल्यावरती टळले ६

तृणपाती धुलिकण
हृदयाचे ते व्रण
मी केले पुसून कोरे
ते सुगंधलेले सारे

मळले सारे काही तू गेल्यावरती मळले ७

पिंपळपान

आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू

दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू

सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू

बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू

प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू

आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू

शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू

शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले
नशिबातील एखादे समाधान शोधू

खंत नको कालची वा तमा उद्याची
खुल्या बाहूंनी जगू.. वर्तमान शोधू

रात्र बाकी ये पुन्हा हरवून जावू
पहाटे माझे तुझे देहभान शोधू

अटळ प्रलय आहे हा विशाल तर
अवघे विश्व तराया पिंपळपान शोधू

सृष्टीचे कोडे

सृष्टीचे पडले कोडे
कोणास ते उलगडेल
फक्त मानवच एवढे
दुसरे कोणी सापडेल

आहेत इतर संस्कृती
कधी घडेल संवाद
कळाली तयांची कृती
तर मिटेल आपला वाद

वेग अमाप प्रकाशाचा
तसे कोण जाईल
मिळाला वेग तयाचा
तर काय होईल

शृंखलेतील प्रश्न अनेक
उत्तर कधी मिळेल
करीता प्रयत्न कित्येक
निसर्ग आपला सांगेल

विश्वाचा विस्तीर्ण विस्तार
असंख्य ग्रहतारे त्यात
मानवाचा सर्व कारभार
जणू बुडबुडा सागरात

नाही भेटलीस तरी ........

तुझ्या आठवणींचा कोपरा
मनात थोडा डबडबलाय
जगणं आता गरज आहे
मरणं केव्हाच मागे पडलय

नाही भेटलीस तरी
चालेल आता
कशाला चिवडायची
तीच तीच व्यथा

आपली जगं बदलल्येत
समाज सारं विसरलाय
आपण हातात हात घालून
फिरलो होत कधीतरी

म्हणूनच म्हणतो
नाही भेटलीस तरी चालेल आता.

रहाट

दुःखाच्या सुकल्या डागण्या
झेलते भूमी काळीज फाटल्यावर
गिधाडेच दिसती आनंदी
प्रत्येक डोह सुकल्यावर

बेचव पहाट घसरे
निसरड्या कासऱ्यावर
लगबग बायाबापड्यांची
माळरानीच्या आडावर

आशेने झुकती नजरा
खोलवरच्या झऱ्यावर
सरासर घसरती घागरी
टिपण्या पाणी थेंबभर

केविलवाणे करकरणे रहाटांचे
वेदना असह्य झाल्यावर
पाणी पाणी पाणी
चित्कार हृदयाचे,
चक्र डचमळणाऱ्या जीवनाचे

आणि अचानक त्या वेळी
पाऊस चिळकांडे विझल्या झाडांवर
पाझरती सुखाच्या लहरी
वाहती उसळत भू कायेवर

ती सध्या काय करते

खर सांगू का अगदी
दिवसभर पाठीचा कणा मोडून
दातांच्या कण्या करून
रात्री  जेव्हा थकव्याची
लाट शरीरभर पसरते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

आपण जातो मस्त शाॅवर घ्यायला साबणाची वडी
संपलेली असते.
साबणाबरोबर भाजीही आणा म्हणून बायको भाजीची पिशवी हातात थोपवते.
हसत हसत आतून कण्हत आपण मग बाजारात जातो
कळत नसत काहीतरी दिसेल ती भाजी आणतो.
भाजी नावाचा तो पाचोळा पाहून बायको जेव्हा कावते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

रविवारचा मंगल दिवस त्यात बायको नसते घरात
टीव्हीवर चालू होते इंडिया पाकिस्तानची मॅच.
हातात आपण घेउन बसतो थंड थंड बियरचा ग्लास
दाणे ,पापड रोस्टेड चिकनची जोडीला असते साथ.
असा जबरी माहोल असतानाही नेमकी इंडिया मॅच हरते.
तेव्हा मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

अलवारपणे डोळे  मिटून आपण स्वप्नांच्या राज्यात शिरतो.
हातात हात घालून तीच्या सोबत जून्या रस्त्यावरून परत फिरतो.
लाजून ती जवळ  येणार इतकयात बायको जेव्हा
अंगावर पाण्याची संपूर्ण बादली रिकमी करते.
तेव्हा खरच सांगतो मला असले प्रश्नच पडत नाहीत की
'ती सध्या काय करते?'

त्रिवेणी
नाते बाभळीचे तुटले
बोरीची चहाडी होती

रक्तातच लबाडी होती

अनिल रत्नाकर


*त्रिवेणी*

झटकली तीने वस्त्रे ती भरजरी
सांडले माझे हृदयच जमिनीवरी

विखुरलो मी पारियाच्या रव्यापरी

*अनिल रत्नाकर*


*त्रिवेणी*
उंची जरा जास्तच गाठली नकळत मीच आज
धड सावलीही नाही मला देता येत आज

माझे मलाही मज, भेटता नाही येत आज

*अनिल रत्नाकर*


*त्रिवेणी*

राहतो आनंदात मी आणि त्यांना त्रास होतो
मी रडू नाही शकत हा काय माझा दोष आहे!

जाणतो, हा त्यांचाच माझ्या यशावर रोष आहे
*अनिल रत्नाकर*



*त्रिवेणी*

घडी घालून ठेवले संस्कार मी कपाटात
सणावारास काढतो थाटात चारचौघात

मला मीही अनोळखी भलताच चारचौघात

*अनिल रत्नाकर*



*त्रिवेणी*

मीच होतो माझ्यातुन जरासाच बाजुला कधी
दृश्य दिसते खुप वेगळे, होतोच मी नवा मला

सुप्त होती ती आगही, भासेच गारवा मला
*अनिल रत्नाकर*



*।।त्रिवेणी।।*

रात्री झोपलो त्या झाडाखाली, दुःख्खे फांदीला टांगली मी
कोणा भासलो मी आत्मा, कोणा वाटे फांदीस भुते लटकली

देता देत गेलो ज्याचे त्याला मी जेव्हा, देव कुळे प्रकटली
*अनिल रत्नाकर*


*।त्रिवेणी।*

रंग माझा करारी करडा आहे
केशरी रक्त, भगवा बुचडा आहे

मीच सरडा असा ओरखडा आहे

अनिल रत्नाकर



*।।त्रिवेणी।।*

टोमणे मारले किती त्यांनी मला नको ते
शांत मी राहिलो, तसे जास्तीच भडकले ते

सुप्त ज्वालामुखी ढवळुन स्वतःच अडकले ते

अनिल रत्नाकर



*त्रिवेणी*

दिवस ते मोरपंखी होते गाभूळ व्हायचे
ऊंबरे आणि दरवाजेही व्याकूळ व्हायचे

कानही पावलांची तीच्या चाहूल घ्यायचे
*अनिल रत्नाकर*


*त्रिवेणी*

डोईवरीचे ओझे मज दाबून टाकत होते रोजच
ठेवीत गेलो पाय आणि उंचीच माझी वाढत गेली

मार्गातली "ती" मंडळी हळुच पाय बाजुस काढत गेली
*अनिल  रत्नाकर*



त्रिवेणी

नाहीच मी बोट ठेवत चुकांवर कोणाच्या शक्यतो
चूक जर माझ्यावरी लादते कोणी तर काय करावे?

माहीत असते घडामोड, अंग तरी त्यांनी झटकावे?
अनिल रत्नाकर



*त्रिवेणी*

दांभिक स्पर्धा तशी भलतीच तेथे
होते गोड हसणे अवघड जरासे

होते मुखवटेही लबाड जरासे

*अनिल रत्नाकर*



त्रिवेणी

वेड्या, अरे आधी बरोबर तर ये
जा ना पुढे, नंतर कुठेही मग तू

आधी जरासे, जाणुनी घे जग तू
अनिल रत्नाकर



त्रिवेणी

बघतो मी तुच्छतेने त्या कचरा वेचणाऱ्या मुलाकडे का?
कचरा करणे जणू माझा हक्कच पीढिजात असल्याप्रमाणे

सवयीने मी झटकले हात, जणू वागणे चूकल्या प्रमाणे
अनिल रत्नाकर


त्रिवेणी

बघतो मी तुच्छतेने त्या कचरा वेचणाऱ्या मुलाकडे का?
कचरा करणे जणू माझा हक्कच पीढिजात असल्याप्रमाणे

सवयीने मी झटकले हात, जणू वागणे चूकल्या प्रमाणे
अनिल रत्नाकर
[10/ *त्रिवेणी*
श्वासात होते कोंडले मी सदाच ग तुला ते
भाग्यात बघ आहेस माझ्या सखे तुच म्हणोनी

आयाम प्राणातील आहे लयीतच म्हणोनी

अनिल रत्नाकर
[10/9, 9:05 AM] Anil Ratnakar: *त्रिवेणी*

धूर नात्यांचा निघाला जाणतो पक्षी
झोपडी निष्पाप होती जाणतो पक्षी

राख रांगोळीच भाळी जाणतो पक्षी
[10/11, 8:28 AM] Anil Ratnakar: *त्रिवेणी*
जमत नाही मला मिंधे होणे कोणाचे
मदत केली मला कोणी हे विसरत नाही

कळत गेले उगा कोणी कर पसरत नाही
*अनिल रत्नाकर*
[10/11, 8:55 AM] Anil Ratnakar: *त्रिवेणी*
आटलोच घेण्या फायदा मी संधीचा
तापलो किती मी, पोळलो मी कायमचा

मान ह्या जगी नाहीच रे बासुंदीचा
*अनिल रत्नाकर*

शंकर बार
एक होता अँकर
बारमध्ये आला
तेव्हा झाला त्याचा टँकर

एक दिवस त्याने
बारमधे  आणला शंकर
प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी
एक बेवडा पण आला

आल्या आल्या मात्र तो
टाइट होऊन पडला
मंत्र  कसले तंत्र कसले ?
पोलिस आले नंतर

बारबालांची करून फरफट
शेट्टीने केली फारच वटवट
पैशासाठी मात्र
झाली नंतर फार कटकट

मांडवलीचा ठरला भाव
पोलिसांनी घातला जोरदार घाव

हे सर्व पाहून , शंकराला फुटला घाम
गर्दीमधून तो पळू लागला
घेऊन झंडू बाम

सारेच तेथे बेवडे होते
स्वतःला विसरलेले
बाटली दाखवून म्हणाले
" हीच गंगा हीच यमुना,
हीच आज गटारगंगा
बिडी काडी नाही उपयोगी "
शंकराकडे पाहून म्हणाले
" अरे ! हा तर योगियांचा योगी,
नवसागराचे काम आहे
काळा गूळ गोड आहे
आजच्या दिवसात उतरली
तर शेट्टी पैसे वापस करणार आहे".

झिंगणाऱ्या हवेमुळे मग
शंकरही हाले मागेपुढे

" आपण आपले जागेवर बसावे
मूर्तीसारखे डोळे मिटावे
नाहीतरी मृत्युलोकच आहे
इथे  जीवन भयंकर आहे"

अभयंकर असूनही
घाबरलेला तो शंकर
उडी मारून मूर्तीगत
कौंटरवर गुपचुप बसला

शेट्टीसहीत सगळेच मग
फुकटची पिऊन
झिंग झिंग झिंगले आणि
लोळून लोळून झोपले.


पाऊस

पाऊस...

जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध

ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट

चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग

अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा

नोटा

बुढि  बोंबले पाहुन जुन्या हजाराच्या नोटा
आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा

पै पै जमऊन पैसा उभा केला
अडाणी म्या बाईन बँकेत नाही नेला
चटणी भाकर खाऊन म्या मारलं माया पोटा
आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा 

पैश्याची पिवशी माई उंदरान नेली
गाव सोडून नाही कवा पंढरपूर ले गेली
चिंध्या करून उंदराने गोंधळ केला मोठा
आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा

उरल्या सुरल्या नोटायचा काय करू बाई
मनामंदी हुरहूर नेहमीची राई
कचऱ्यात  फेकून दिल्या ठेऊन उरावरती गोटा
आव काय करू माय सगळा पैसा झाला खोटा

समांतर

आपणही तेच आहोत अन् आयुष्याचा प्रवासही
अंतरे ही तीच आहेत अन् रस्तेही..
वाटा वेगळ्या नाही झाल्या आता समांतर झाल्यात एव्हढंच..
मित्र आत्ताही आहोत हातात हात नाहीयेत एव्हढंच..

होईल.. सराव होईल मलाही  तुझ्याशिवाय चालायचा..
आधीही होतोच की एकटा अन् भरकटलेला..
तु मैत्रीचा हात देऊन सावरलेस मला..
आता भरकटणार नाही... फक्त एकटा असेन एव्हढंच

शिकेन मी ही हळुहळु अबोलपणे दु:ख पचवायला..
पण त्यात फक्त आक्रोश असेल.. व्यक्त होणं नाही
शिकेन मी ही तुझ्याशिवाय आनंद साजरा करायला..
पण त्यात फक्त साजरा करणे असेल.. आनंद नाही

मला किती लवकर पटेल असे समजाऊन सांगतेस तु
किंवा तु जे समजाऊन सांगतेस ते लवकर पटते मला
यावेळीही एकदम पटलं तुझं वेगळं व्हायचं कारण
" बरोबर असणं हे महत्वाचं बरोबर दिसणं नाही "

पण सखी तु चालत रहा मागे वळुन न पाहता
मी ही पुर्ण करेनच माझाही प्रवास न थांबता
तुझ्या सावलीच्या कडेकडेने.. तिला स्पर्श न करता..
अडखळलीस कधी... कधी ठेच लागली..
कधी एकटी पडलीस.. आधाराची गरज वाटली कधी...
विश्वासाने मागे बघ.. मी तिथेच असेन.. अंतर राखुन
तुझ्या सावलीच्या कडेला.. समांतर वाटेवर...

मीच का ?

मीच का ओझे वाहावे ?
संस्कृतीचे सभ्यतेचे
पांढऱ्या कॉलरीत माझ्या
मीच का गोड बोलावे ?

मीच का पूजा करावी ?
मीच का वारी करावी ?
मीच का त्यांच्या चुकांना
पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा

मीच का साफ करावा
माझाच चष्मा हरघडी
त्यांनी चालावे रुबाबात
काळा चष्मा वापरोनी

मीच  चोरटेपणाने
का पाहावे स्त्रीकडे
ते भोगुनीयाही तिला
लेऊनी घेती हारतुरे

मीच बांधलेला समाजी
मीच बाधलेला भिडेने
मीच छाती आत घेउनी
का चालावे घाबरोनी ?

अशाच या कोंदट जगातील
सहावा लागे कोंडमारा
प्रकाशाचा अन सूर्याचा
जो ढगाआडून पाही.


गुढी

गुढी

गुढीसाठीच पाट धुतले समाजातले
गणंगानेच  वाहिले पुष्प परसातले

कडूलिंबात सत्य घोटाळले आज ते
गडूला, लाज झाकण्या पालथे घातले

लबाडांना जरा दणकवूच रे वेळुने
खडीसाखरच ल्यायले पदक ते मातले

जरीचे वस्त्र झाकते लाज बेताल ती
फुलांनी छपविले विचार ते नरकातले

 हळद कुंकू अता खरे राहिलेच नाही
 रुधीर किती ते भकास अता जखमातले

लिहितो मी

लिहितो मी ते, जसे असेल जे, मनात माझ्या
नसते कोणी मला अडवत या जगात माझ्या

शर्यतीतुन

शर्यतीतून जरा बाजूला व्हावे रे आणि बघावे
धावणारे सारे जिंकावेत असे वाटेल तुम्हाला

कायी माय
बसच्या खिडकीतून दिसणाऱ्या विदर्भातल्या काळ्या मातीकडे पाहून सुचलेल्या काही ओळी.


कायी माय


कायी माय ढगानकड डोया लाऊन पायते
अमृताच्या सरी आता कवा बरसते?

वाट पाऊन पावसाची तिचा गया सुकला
नदीसंग शेजारचा नाला हि आटला
 
दिसभर उन्हामंदी सोसते उष्ण झावा
तिच्या अंगणातून पयाला चिमण्यांचा थवा

कोकीयेचे सूर मात्र कानी तिच्या पडे
कापसाच्या बिया आता पाण्यासाठी रडे

हिरवा शालू तिला नेसायचा हाये
झेडूंचा गजरा तिला माळायचा हाये

कायी माय झाली पाण्यासाठी आतुर
ढगानले धाडले दोन चार पतूर

ढगानपाशी पतूर अजून पडूनच हाये
कायी माय पावसाची वाट पाहतच हाये

मोबाईल
गावातल्या राम्यान इकला, शेतामंदला बैल
पैश्यापास्न घेतला त्यानं, नवा एक मोबाईल

मोबाईल मंदी गाणं कसं, टुरूटुरू वाजे
रम्याच्या मनात मोर जसा, थुईथुई नाचे

मंग राम्याले रोज येई, मालकाचे काल
म्हणे, बाजारात पाठव की, शेतामंदला माल

मोबाईल मुळं झाला, राम्याच्या घरी वांदा
त्याच्याचमुळं ईकला गेला, शेतामंदाला कांदा

घरच्या बुढयाचा चढला, भलताच पारा
म्हणे, लागला का बे राम्या, तुले शयराचा वारा?

मोबाईल चे हाये म्हणे, जागोजागी टावर
बिल तरी भराची, हाये का बे पावर?

मोबाईल मुळं राम्या, कोणाचं भलं झालं?
अजुनपास्तोर इकल, न्हाई शेमंदल आलं

बापामुळं  राम्याच झालं, डोकं जरा गरम
चार शब्द सांगून त्यानं, बापाले केलं नरम

म्हणे, मोबाईल न झाले, शयरामंदले येडे
खेड्यातलेबी लोकं आता, राहले न्हाई लेडे

मोबाईलमंदी हाये म्हणे, यफम ची कन सेवा
पतुर अन चिट्टी आता, याच्यामंदीच लिवा

मोबाईल गावामंदी, भलताच गाजला
थांबतो इथेच मित्रांनो, माझा मोबाईल वाजला

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी या गं
अलग करा गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्या
झाडावर पाखरू बसलं ...||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया
खतं टाकाया, कुणी न दिसलं
बहर बघुनी, लाळ गाळती
ताव माराया, अभय चळती
कुणी तरी या गं
गोफण धरा गं
कच्च्या आंब्याला लई बाई पिडलं
गं बाई माझ्या
झाडावर पाखरू बसलं ...||२||

सांगा

बंधने झुगारणे माझ्याच हाती
मानणे ना मानणे माझ्याच हाती

कापलेले पंख किती उडणार सांगा
प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा

दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा
वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा

छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा
रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा

जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला
हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा

ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||

झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||

हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, 'ती' विद्वानांची जात
'ती' विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||

शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||

रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||

दुर्बोध कविता

पौर्णिमेच्या अंतरात
असते एक अमावास्या लपलेली
म्हणून तर चोऱ्या होतात
पौर्णिमेच्या दिवशीही..........

अमावास्येतही लपलेली असते
एक पौर्णिमा
म्हणून तर यश मिळतं
अमावास्येच्या दिवशीही ...........

आभाळाच्या अथांग पोकळीत
असतो एक इमला लपलेला
अधांतरी तरीही धरलेला
देवाने...............

देवाच्या इमल्यात असते
एक बायको
पण सैतानाची
वाट मात्र पाहते ती
रोज रात्री देवाची ........

असले उलटे व्यवहार
असले जरी निसर्गाच्या अंतरी
तरीही जीवन बहरत असते
निर्मित असते काही ना काही
काही ना काही ...........

मुलगा

जमले सभोवताली जे
ओळखीचेच होते

साऱ्यांच्याच शस्त्र हाती
निः शस्त्र मीच होतो
हत्यारे उगारली जरी
उपकारकर्ता मीच होतो

जगण्याची भ्रांत त्यांना
जेव्हा जेव्हा पडली
माझीच भाकरी मी
त्यांच्या पुढ्यात वाढली

सारेच कसे विसरले ते
जेव्हा नागडे होते
माझेच वस्त्र अर्धे
पांघराया शरमले होते

त्यातील एक लहानगा
अगदीच पोर होता
वार त्यानेच केला
जो माझा मुलगाच होता.

परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी
राजसा! परतून ये तू घरी॥

हात चांदण्याचे

मी करू कशाला
सुखाशी दोस्ती
दुःखालाही पोळती
चांदण्याचे हात माझे
कशास बाळगू मी
भीती आता अंधाराची
काळीज हे भंगले
खुल्या उजेडात माझे
गायले पुन्हा पुन्हा मी
गीत जीवनाचे
सूर सारेच ज्याचे
गाहिऱ्या तमात होते
उरले ना भय मज
आता मरणाचे
दडलेत उःशाप सारे
सरणात माझे....

तूरडाळ टंचाई

तुरडाळ शेतात पिकली
अन बाजारात येऊन भडकली
कोण लागणार तिच्या नादी
तशी ही स्वस्त नव्हती कधी

गिऱ्हाईक नुसतेच लांबून जाई
भाव विचारण्याची सोय नाही
फोडणीशिवायच तडतडू लागली
व्यापाऱ्यांची फाटू लागली

तरीही  मख्ख व्यापाऱ्यांनी
साठेबाजी चालूच ठेवली
सरकारने डाळीला मुक्ती दिली
पण फक्त गोदामे बदलली
अधिकाऱ्यांची चंगळ झाली
सामान्यांची कोंडी वाढली

मोर्चे, आंदोलने करुनही
सरकार घट्ट बसून राही
वरण भातालाही जनता महागली
समोर दिसेल ते मुकाट खाऊ लागली

आता भाव पाहत नाहीत
जमले तरीही घेत नाहीत
इतर डाळींची खिचडी करून
सामान्यांनी भूक भागवून घेतली


सावळा-सावळा
सावळा-सावळा , मेघ हा घननीळा ,
तिरी इंद्रायणी , बरसला-बरसला  ॥१॥
थिरकला-थिरकला , टाळ मृदुंग थिरकला ,
 वैकुंठीही नादब्रम्ह , उमटला-उमटला ॥२॥
दाटला -दाटला , उरी हुंदका दाटला  ,
माऊली प्रीतीचा , पूर लोटला लोटला  ॥३॥
सांडला -सांडला , अह्ंकार सांडला ,
गळा-भेटीनं विठू-विठूस भेटला       ॥४॥
सुखविला-सुखविला , वारकरी सुखविला ,
बुडवूनी भाक्तित , तो कोरडाची राहिला ।।५।।
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

पाघोळ्या .....

पाघोळ्यांचे पाणी पाहत,
           टपरी आड उभा राहिलो  ......
विसरलेल्या छत्रिसाठी
कुसत मनात राहिलो .........
भुर्कन उड्वून पाणी
आली  ती ही आडोशाला  .....
काळेभोर केसान्वर दवबिंदु लगटले
लटक्या रागने दूर त्याना सारले .........
झटकली मान, पदर जरा  सावरला ,
अत्तर्राचा फवारा माझ्यावरी शिडकला .......
थोडीशी ती वरमली .....
तिच्या-माझया नजरेची मिठी तीने सोडविली .....
जन्मांचा पाऊस ,
मनात माझ्या कोसळला .......
तोल सावरण्याचा असफल
प्रयत्न मी केला ...........
कधी नव्हे तो पाऊस आज
असा काही बरसला ....
तिच्या माझ्या भेटीसाठी का
खेळ त्याने मांडला .........
घ्यायची का कॉफी
हळूच तिला विचारले ............
हसून नकार द्यायचा
तिने मला शिकविले .........
नकारने तिच्या , ती अधिकच भावली
ऱ्हदयची धडधड वेगाने वाढली .....
नको म्हणालो तरी,
 अचानक तो थांबला ..
मात्र तीने मोक
   अवचित साधला ......
आभाळ आलय भरून
सुगंध तीचा दरवळतो ...
पाघोळ्यांच्या आडोश्यात
तिला पुन्हा शोधतोय........


खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल
हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मोक्षाकडे निघावे ठरवून माणसाने

हायकू -

हायकू :

१)  लहरी वारा 
पानांची सळसळ
   सशाचा छळ 

२)  ढगांची हूल
पावसाची चाहूल
  भुई निष्प्राण 

३) वाऱ्याची गती  
निसर्गाची संगती 
    मन बेभान  

४) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
   ऐकते बीज

५) कावळा पाही 
 चिमणीचं सदन 
   खुनशी मन

माराल काय तुम्ही तयांना
माराल काय तुम्ही तयांना
हाती त्यांच्या समशेर आहे
हात तुमचे बांधलेले
क्षमा याचनेची आर्जव आहे

निः शब्द मौनता तुमची
कमाल आहे भ्याडपणाची
त्यांनी किती कुरापती काढल्या
परी षंढ तुमचा जागा आहे

लाज असे तुमची  तुम्हाला
सभ्यतेतही भीड भरली
काय तुम्ही कराल सामना
अशा जनांचा वा मनाचा

ख्रिस्त
शांततेचे गात गाणे
अवतरलासी तू भूवरी या
पिचलेल्या गरिबांचा क्रूस
वाहिलास खांद्यावरी या

प्रेम दिधले तू जगाला
वेदना पचवूनीया
का न समजली दयार्द्रता तुझी
तुला खिळवणाऱ्या राक्षसांना

अजूनही संहार होतो
भाविकांचा प्रेमळ जनांचा
क्रूरपणे गिळता तयांना
दिसेल का क्रोध लाजताना

नसती जरी सगळेच प्रेषित
तुझ्यापरी देवाचे सुत
का प्रयत्नांना आज त्यांच्या
कुचेष्टेचे बिरुद लाभे

हात मी निढळावरी लावुनी
उभा इथे शतकानुशतके
वाट तुझी पाहताना
देह पंचत्वी विलीन होतसे

शब्द... माझ्यासाठी
मुक्तक:

होऊ नकोस तू उदास माझ्यासाठी
तू एकदा अजून हास माझ्यासाठी
मी राहतो इथे, तुझ्याच अवती-भवती
घडतो तुला तरी प्रवास माझ्यासाठी!

गजलः

फिरतात शब्द आसपास माझ्यासाठी
हसतात शब्द दिलखुलास माझ्यासाठी!

पत्रामधून ते दुरून येती येथे...
करतात शब्दही प्रवास माझ्यासाठी

वाहून आणती जुन्या स्मृतींचे ओझे
करतात शब्द हे कशास माझ्यासाठी?

होतात कोरडे, कठोर ते वरपांगी
जपतात शब्द पण मिठास माझ्यासाठी

मी खोल अंतरी उदास असतो तेव्हा
असतात शब्दही उदास माझ्यासाठी

होताच सांजवेळ ओसरीवर माझ्या
जमतात शब्दविहग खास माझ्यासाठी!
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते.
तुझ्या डोळ्यात माझे जग असावे वाटले होते;
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते.

जरी भात्यात होती राख ओली साचली माझ्या;
निखार्याला पुन्हा या का फुलावे वाटले होते.

तुझ्या माझ्या क्षणांच्या आठवांनी मोडले जेव्हा;
मला तू अन् तुला मी पांघरावे वाटले होते.

कशाला भावनांचे खेळ सारे मांडले वेडे;
जरा स्पर्श तुला माझे कळावे वाटले होते.

कुणाला दोष द्यावा आज येथे ना कळे आता;
तुझ्या माझ्यातले अंतर मिटावे वाटले होते.

नटावे लागते आहे, सजावे लागते आहे

नटावे लागते आहे, सजावे लागते आहे
कराराच्याप्रमाणे देह व्हावे लागते आहे

कधी विधवा, कधी पत्नी बनावे लागते आहे 
सती जावे, सतीचे वाण घ्यावे लागते आहे

कधी होत्या जिथे ज्वाळा तिथे धग राहिली थोडी
उतू गेल्याविना आता निवावे लागते आहे

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे

कळेना कावळ्यांवर, मृण्मयी, ही वेळ का आली  
स्त्रियांना आणि पिंडांना शिवावे लागते आहे
गुंतायाचे नव्हते मजला....!!
गुंतायाचे नव्हते मजला
ज्या ज्या गोष्टींमधे,
गुंतत गेलो सोडवत गुन्ते
त्या त्या गोष्टीन मधले
गुंतायाचे नव्हते मजला.........त्या मधे मी गुंतत आहे

गुंतले आहे ह्रदय माझे एका ह्रदया मधे
रेशमाचे धागे सारे गुंतले एकमेका मधे
त्या धाग्याना किनार आहे गुंफत जाणार्या विचारांची
गुंतनारे विचार ते रेशीम धाग्यात गुंफत आहे.
गुंतायाचे नव्हते मजला.........त्या मधे मी गुंतत आहे

आशा होत्या आणिक सार्या अपेक्षाचे ओझे
गुंतले होते मन माझे त्या आशा अपेक्षामधे
गुंफत गुंफत धागे आठवणीचे, मी मजला हरपत आहे
त्या आठवणींच्या धाग्यांचा गुंता अजुनही सोडवत आहे
गुंतायाचे नव्हते मजला....त्या मधे मी गुंतत आहे

मायेचा तो स्पर्श मजला , घेऊन जातो माझया गावा
सखे सोयरे स्मरती सारे ,गुंतती मला त्या मायेमधे
माये मधला तो ओलावा मजला गुंतवत आहे
गुंतायाचे नव्हते मजला....त्या मधे मी गुंतत आहे.

लोभाच्या त्या मायेपायी विचार माझे बदलत आहेत
गड्या आपुला गाव बरा तो
विदेशी का मी गुंतत आहे?
गुंतायाचे नव्हते मजला....त्या मधे मी गुंतत आहे.

आसवातील थेंबंचा त्या
ओलावा मी जपत आहे
जपता जपता ओलावा मी
वेदनेत त्या गुंतत आहे
गुंतायाचे नव्हते मजला....त्या मधे मी गुंतत आहे.
स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका

एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल

पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल

खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल

शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?

आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल

छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल

चंदनी

पुन्हा पुन्हा उगाळते मी,तेच खोड चंदनाचे...
चंदनाचे हात माझे श्वास होती चंदनाचे...

एक एक चांदणी मी, जड हातानेच पुसते.
तरी पुन्हा पुन्हा नव्याने,तीच आकाशात दिसते.

काळोखाच्या गोधडीने बनवलेले एक पोते,
चंदनी चांदणे मग, ठासुनी मी त्यात भरते

तटतटून एक धागा,पुन्हा उसवतोच नेहमी,
प्रकाश चंदेरी पुन्हा मग,विखरुनी मनात भरतो.

वास येतो चंदनाचा,या अनोख्या चांदण्याला
पुन्हा पुन्हा उगाळते मी, आठवांच्या चंदनाला.

शब्द
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार
शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार  
शब्दांची घरटी ,  शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी
शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची !
शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी  मागे ... शब्द
आठवणींची शाळा
जेव्हा जेव्हा मनामध्ये आठवणींची शाळा भरते
कोवळ्या कोवळ्या सोनपावलांनी दुपार अलगद संध्याकाळ होते.
संध्याकाळी दरवळतो मग मनात एक हळवा सूर
प्रयत्नपूर्वक थोपवतो मी उधाणलेला अश्रूंचा पूर .
उठून जेव्हा दिवा लावतो अवघ्या घराचे सोने होते
अंधाराचे काळे राज्य तेवढ्यापुरते मागे होते.
कपाटातून हळूच मग मी माझी जुनी वही काढतो
प्रत्येक पानापानामधून हरवलेला भूतकाळ पुन्हा चाळतो..
वहीतलं सुकलेलं गुलाबाच फुल
बांधत त्या दिवसांशी एक रेशमी पूल.
सुचत नाही काहीच मग मी उगाच कावरा बावरा होतो
बेधुंद उडत जाणारा मदमस्त पारवा होतो.
आता मनाचे सारे बांध पुरते फुटून वाहू लागतात
डोळ्यांचा कडा  नकळतच आर्द्र होऊन जातात .
निर्धाराने आठवणींना मग मी परत धाडतो
आणि वेड्यासारखा पुन्हा त्यांची शाळा भरण्याची  वाट पाहतो.

“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण

आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते

आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी

कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?

रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू 'अभय' इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
"रावणदहनाच्या" हार्दिक शुभेच्छा...!

चल उठ मर्दा
चल उठ मर्दा
घे हातात कुदळ
खोदुन काढ जमीन
आळस कश्याला.?

चल उठ गध्या
माय राबतेय तुझी
घे ओझे पाठीवर
असा लोळतोस काय.?

चल उठ राया
घे हातात नांगर
नांगरून काढ शेत
बैलावर ओझं कश्याला.?

चल उठ कोळ्या
पुन्हा जाळे फेक
अडकेल मासा
प्रयत्नांशी परमेश्वर.

चल उठ पोरा
पाड फडश्या पुस्तकाचा
येईल तितकं लिही
नक्कल कश्याला.?

चल उठ मंत्र्या
किती करशील लुच्चेगिरी?
रयतेची सेवा
एकदा तरी करशील.?

चल उठ मर्दा
लढ थोडा हिमतीनं
घाबरून जाऊन कुणी
जग जिंकत नाही.

पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे

वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
'अभय' आणि 'धार' दे
कळली तर कळवा
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
रोज वाढणाऱ्या धस्कटास, 'अभय' असेल तर
आंबट गोड..
शाब्दिक घाव कितिक ते बसले,
वज्राहूनी अति कठोर अंमळ..
गोड आठवणी संपल्याच जणू,
अंतरातल्या त्या म्रुदू न चंचळ ..
विषयांचे पेव फुटलेले,
आणून गेले मनांना भोवळ..
आठवल्या त्या तिक्ष्ण नजरा,
अन बोचरे उसासे निव्वळ !
घे जवळी चल उडूनी जाऊ
मनपवनाचा घेऊन वेग..
दरीखोर्याना मागे टाकून
मिटवून टाक ती वेडी भेग..

संवाद स्वतःशी स्वतःचा
तुला रोग नाही तुला लोभ नाही
तुझा वेदनेशी न संबंध काही

शरीरास तू आपले मानतो रे
खरा कोण तू हे कुठे जाणतो रे

तुला मोह माया न मत्सर असावा
तुला मोक्ष इतुकाच हेतू दिसावा

तुझे दुःख तू दुःख मानू नको रे
सूखे शोधण्या व्यर्थ भटकू नको रे

स्वभावास अपुल्या खरे मान मित्रा
तुझ्या आत आनंद तू जाण मित्रा

तुला जन्म नाही तुला अंत नाही
कशाचाच आनंद वा खंत नाही

तुझा अंत ही कल्पना आज मिथ्या
व्यथा वंचना यातना सर्व मिथ्या

कधी ना घडावी मनी भाव हिंसा
सदा आठवावी जगी तू अहिंसा

तुझे भाव मित्रा तुला तू घडवती
तुला कर्मबंधातुनी मुक्त करती

तुझा कोण तू हे स्वतः जाण आता
खरे देव शास्त्रे गुरू मान आता
विडंबन : ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
ती फुटली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

ती फुटली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
पेल्यात अडकली बोटे हा दोस्त सोडवित होता

ती भारी होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी पोऱ्या सावध काचोळा* झाडित होता

पळभरात गमले मजला संपले ढोसणे माझे
पडवीवर बडवत तेव्हा बेफाम बाप मज होता

ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो

जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....
त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना......
ऋणानुबंधाच्या
मुसळधार पावसासारख्या
ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!!
बायको
अशी आपली बायको असावी - हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी
अशी आपली बायको - भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी
अशी आपली बायको - चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी
अशी आपली बायको - सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी
अशी आपली बायको - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी
अशी आपली बायको - प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी
अशी आपली बायको - शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी
अशी आपली बायको - व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी
अशी आपली बायको - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी
अशी आपली बायको  - सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी
अशी आपली बायको असावी - माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

पहिला पाऊस
पहिला पाऊस खूप काही देऊन जातो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या जीवांना सुखावून जातो. उन्हाने करपलेल्या, भेगा पडलेल्या ओसाड धरतीला भिजवून जातो. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध तर काही अप्रतिमच असतो. कडक उन्हाने जीवाची जी काही लाही लाही झाली असते ती पहिल्या पावसाने अगदी घामासकट धुवून निघते. ते टपोरे पाण्याचे थेंब भलेही टोचणारे असतील पण ते आता हवे हवेसे वाटतात. ओले झालेले कपडेसुधा आनंदाने बदलावेसे वाटतात. डोक पुसत मग वाफाळलेला चहा घेत खिडकीत बसुन नुसतंच त्याला पाहत बसावसं वाटतं. आणी मग मनात विचारांच जे काहुर माजतं ते असं......


आभाळ गडगडलं, विजा चमकल्या
ढगांनी वेढलं तळपत्या सूर्याला.
थेंबामागून थेंब जमिनीवर पडला
काळ्या मातीतुन सुगंध दरवळला.

आल्या सरी रीप-झिप करीत
भणंग धरतीला ओल्या करीत.
आधी टपोरे थेंब, मग टपोऱ्या गारा
न्हाऊन निघाला हा परिसर सारा.

सुखावली मनं, शांत झाली धरती
उपकार त्याचे जो वरूण आहे वरती.
थोडा अजुन बरस, मज शांत भिजू दे
घामाच्या धारासाहित निराशा पुसू दे.

चिंब हि धरती अन गार हा वारा
तुझ्या कवेत आज, हा विश्व सारा.
उधळू दे रंग मज तू माझ्या मनाचे
विश्वाच्या रंगात इंद्रधनुष्य प्रेमाचे.

टाक इवलासा कटाक्ष या धरतीकडे
बघ किती आनंदले इवलेसे गाव माझे.
सुखावले गावकरी तुझ्या आगमनाने
पुजतील तुला जन्मभर अभिमानाने.

असाच बरसात रहा चोहीकडे
पुन्हा दुष्काळ आम्हा देऊ नकोस.
गावकऱ्याच्या च्या भावनांशी
असा लपून- छपून खेळू नकोस.

आजचा दिवस तुझ्या संगतीत गेला.
तुझ्या वाचुन फक्तच उन्हाळा नी हिवाळा.
असेच उपकार कर या धर्तीवर
आमचाही असंच तुझ्यावर जिव्हाळा.

तिला पाहण्याचा लळा लागला
तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागला

नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागला

नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागला

मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागला

उभय चेहर्यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागला

युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागला?

उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागला

शहाणे वागती रीतीप्रमाणे
शहाणे वागती रीतीप्रमाणे
जिणे आखीव भूमीतीप्रमाणे 

कटाक्षांचे जरी जाळे मुलायम  
चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे 

लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे 

दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे

दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची 
असावी क्लांतता वीतीप्रमाणे

हवा ठेहराव कवितेला भिनाया   
भिडाया चाल खगगीतीप्रमाणे 

मकरंद
गूज तुझे माझे
नजरेत बंद
डोळा मकरंद
                    सेवियेला

मोगऱ्याचे भाग्य
खुलले श्वासात
उरात वसंत   
                    गंधाळला

अवसेची रात
झाली चांदरात
सखी लोचनात
                  डुंबताना

संवाद गुंगला
कापऱ्या ओठात
भावनांचा दूत
                स्पर्श झाला

स्पर्श पाझरला
स्पर्श ओथंबला
स्पर्शच बोलला
                प्रेम भाव.............!!!

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥

इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, 'अभय' मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्हाड, अन चालते व्हा ...॥

कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
झाडते आहे तरी कविता दुगाण्या

भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या

कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?

युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन् तुतार्या कालच्या झाल्या पिपाण्या

हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या
कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!
माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

ऐश ट्रे!
ऐष-ट्रे!

न रिते पान कुठले, जुन्या या डायरीत आता …
सर- सर सरणारे ऋतू,
"ओले-सुके" 
…… "बेरके !"
भरून गेलाय ऐष-ट्रे सुधा….
कधीचा!!!

व्यक्त-अव्यक्त भावनांची निराकार राख साचालीये त्यात.
"विचार"; जे अर्धवट पण नव्हते पेटले,
आणि,
चिरडले होते तसेच….
त्यांचीच काही थोटकं   साठलीयेत या ऐष-ट्रेमध्ये अजूनही!!!

"यामधून पुन्हा धूर यायलाच नको!"
याच हेतूने, रगडलेले काही मतले… काफ़िये…
ज्यांचे ओढले होते एक-दोनच कश…
ते ही आहेत,
आणि;
माझ्या 'ब्रांड' ची नसलेली काही थोटकं, 'ठसका' लागून पहिल्याच कश मध्ये चिरडली होती जी क्रूरपणे…
ती ही आहेत

भावनांच्या आवेगामध्ये रात्रीच्या मनगटातून टपकणाऱ्या रक्ताळलेल्या आठवणी सुद्धा,
निपचीत पडल्या आहेत कधीच्या त्यामध्ये..
प्रसंगी धुंदीत तोडलेले चंद्राचे लचके, जे भिरकावले होते नशेतच या ऐष-ट्रे मध्ये,
येतोय त्यांचाही दर्प यातून!

काहींच्या नावाच्या काड्या आहेत यात,
ज्यांच्या स्मृतींमध्ये पेटवल्या होत्या काही चारोळ्या,
झाले तशे पुष्कळ दिवस, पण त्यांनाही आहे दर्प, "त्यांचा" असा स्वतंत्र!

प्रहराच्या या वळणावरती नवं असं काही सुचेल असं नाही वाटत आता...
शोधतोय कधीचा,
या ऐष-ट्रे मध्ये,
एखादा तरी झुरका मरता यावा इतक्या लायकीचे एखादे थोटूक..
तल्लफ आलिये,
तल्लफ आलिये!!!

स्तंभ
प्रश्न तर प्रश्नच असतो
आधी विचारला काय
नंतर विचारला काय
वेळ गेल्यावर विचारला काय?

उत्तराच्या अपेक्षेत तो
स्तंभासारखा उभा असतो
"अशोक स्तंभ! "
विजयाचा स्तंभ.....? 
की एक प्रश्न.....?
अनुत्तरित राहिलेला
अशोकाला पडलेला
की त्याने लोकांना
विचारलेला? 
जणू,  माणुसकीचा दृष्टिकोन कोणता?

पाहणारे उत्तरासहित येतात
पण प्रश्नाचे अमर्याद रूप पाहून
तसेच परत जातात
प्रश्न मात्र उभाच " स्तंभासारखा "
जगाच्या अंतापर्यंत...............

गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे 'अभय' गेले
गेले दाणापाणी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी
सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला 
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील 
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी    
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

हसत जीवन जगून तर बघ...
नेहमी प्रसन्न राहील मन
कधी चिंतेला दूर सारून तर बघ

नाही असफलता मिळणार
कधी सफलतेची आशा करून तर बघ

नाही करावा लागेल अपयशाचा सामना
कधी जिंकण्याचा प्रयत्न करून तर बघ

कुणास ठाऊक कोणती नवीन उमंग जागी होईल
कधी आत्मविश्वास मनामध्ये भरून तर बघ

होऊन जाईल कठीण काम सोपे
कधी चेहऱ्यावर हलकेसे हास्य आणून तर बघ

कुणास ठाऊक एखादी नवीन वाट सापडेल
कधी हिमतीने कामाची सुरवात करून तर बघ

सहज ध्येय गाठता येईल जीवनाचे
हसत हसत जीवन जगून तर बघ. 

फुटावे हे भांडे आता
फुटावे हे भांडे आता
चेपलेले जागोजागी
खूप खूप वाहिलेले
पुरे आता व्हावे उगी

वाहणेच जन्म होता
साठवले काही नाही
कुणासाठी किती वेळा
मोजण्याला अंत नाही

वाहीलो भरभरुनी
कधी गेलो ओसंडूनी
परी काही हरवले
सापडले ना शोधूनी

झिजण्याचा क्षोभ नाही
वाहिल्याचा क्रोध नाही
थकुनीही कणकण
सावलीचा लोभ नाही

पलीकडे जावे आता
जिथे भय हाव नाही
मनामध्ये रुजलेले 
ते सुखाचे गाव नाही 
भाजी जळली
आणि शेवटी
भाजी जळली
कढी फाटली
उकळीने
तसे मला तर
जमलेच नाही
कधीच काही
सैपाकाचे
आणि लाखदा
सांगून तिने
जळणे उतणे
टळले नाही
आता हातात
ब्रेड आम्लेट
कच्चे खारट
ईलाज नाही
हवेच होते
थोडे शिकाया
अन ढवळाया
डाळ वगैरे

ओंजळ
तुझ्या परिजातकाच्या फुलांनी
तू माझी ओंजळ भरलीस
आणि ओंजळीत भरून राहिलेल्या गंधानं
तू मला चिंब भिजवलस.. तुझ्या प्रेमात
भिजले मी, भारले मी, मुग्ध मी,
माझ्यात ना उरले मी.. तुझ्या प्रेमात
सांग, कुठून शिकलास इतकं प्रेम करायला ?

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका
बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, "गाय आमुची माय"
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला "अभय" द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा
नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा 
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या    
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..

नि:शब्द हो, कविते
सांगून झाले खूप, तू नि:शब्द हो, कविते
मौनात बाकी पोचवू, नि:शब्द हो, कविते

केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना
वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते

हा अक्षरांचा गोफ केवळ कागदी आहे
ना गंध त्याला, ना मधू, नि:शब्द हो, कविते

होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना 
होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते

बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमते
त्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते

सेवायला बागेत नाही 'भृंग' कोणीही
वाया नको ग मोहरू, नि:शब्द हो, कविते
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे
ब्रह्म स्वयंभू, बाकी येथे तमाम संबंधांचे

कूस सवाष्णेची, पण दिसते कपाळ वैधव्याचे
पोर निरागस असुनी ठरते हराम संबंधांचे

रोग दुराव्याचा दोघांच्या मनास जडला असता
दु:खद नात्यावर चोपडतात बाम संबंधांचे

लाभ सहज होतो ज्याचा ते सहज विसरले जाते
मोल करी ना कोणी हल्ली छदाम संबंधांचे

थेट अनादी कालापासून सामने चुरशीचे
स्त्री-पुरुषांच्या मेळाचे, साम-दाम संबंधांचे

यौवन येता वात्सल्याचे, जरेत मग गात्रांचे
'भृंग', जगी चुकले कोणाला विराम संबंधांचे?
मैत्री
मैत्री म्हणून साठवलेल्या
तुझ्यामाझ्या आठवणीचे
आत्ता साल कितवे असेल ?
चिखल करून मातीत
खेलालेया खेळच
आत्ता वय किती असेल ?
दुर् कुठे निघून गेलेल्या
तुला आत्ता मी
फारसा आठवत नसेन
पण कुठल्यातरी सायंकाळी
तुला आपला
लपंडावाचा खेळ आठवत असेन
तू गेल्या नंतर
आमरायीतल्या आंब्याला
मोहोर कितीदा आला
पण तुझ्याशिवाय आंब्याच्या झाडावर
दगड कुणाचा नाही गेला
मैत्री म्हणजे  ...
काय असते रे  ...
रोज भेटावे
असा आपला हट्ट असतो का रे
नाही ना ??
मग कधीतरी भेटल्यावर 
" अजून काय विशेष ? "
यालाच मैत्री म्हणतात का रे ?             

शिंपले
अथांग  असा सागर आणि
त्या सागरातले लहानसे शिंपले

रेतीचा एक कण
हळूच त्यात शिरावा व
शिंपल्याने अलगद तो
आपल्या कवेत घ्यावा

शिंपल्याच्या प्रेमात आणि सहवासात
त्या कणाचा मोतीच बनून जातो

मोत्याचा प्रवास थेट शिंपल्यातून
राजकन्येच्या गळ्यात होतो
आणि ते शिंपले मग
पायदळी तुडवल्या जाते

शिंपले नाहीसे होण्याचे दुखः
मोत्यांवर उमटलेले नसते , कारण

त्यांना काय माहित
शिंपल्यांनी आपल्याला
केवढे जपले असते.


बोलण्यापुरतीच उरले बोलण्याचे
बोलण्यापुरतीच उरले बोलण्याचे
पाहिले तू फक्त येथे फायद्याचे
झोपडी माझी तुझी उध्वस्त केली
काय मी सांगू अजुन या कायद्याचे

पहिली नाही कधीही पुर्ण भाकर
स्वप्न बघतो तो मिठाई आणण्याचे

मोकळे होवून जावू आज आपण
ऐकवू आता बहाणे सोडण्याचे

कर्ज स्वप्नांचे किती मी घेतलेले
राहुनी गेले बियाणे पेरण्याचे

अश्रू का गळतात.........?
दुखःच्या क्षणी
संवेदनशील होतात
वाट मोकळी करून
पटकन टपकतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

आनंदाच्या क्षणी
डोळे भरून येतात
इवलीशी जागा 
स्वतः व्यापून घेतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

कुणी रागावल्यास
स्वतः रुसून बसतात
तडत- फडत
घरा (डोळ्या) बाहेर पडतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

कदाचित त्यांनाही
हसायला आवडत असेल
म्हणून दुखःच्या क्षणी
त्यांनाही रडू येत असेल

स्वतःला डोळ्यातून काढून 
ते मनावरचं दुखः
स्वतः घेत असतील
माणुष्याचे दुखः हलके व्हावे
म्हणून स्वतः खपत असतील

त्यांनाही असनं
आवडत असावं
म्हणून त्यांचही अवसान
गळत असावं

गालावरून तुरु- तुरु खाली उतरून
त्यांनाही ओठांना भेटावस वाटत असेल
ओठांना जादूची झप्पी देऊन
त्यांनाही हसावसं वाटत असेल

इतरांसाठी स्वतः झुरतात
सुखः- दुखःत नेहमी साथ देतात
त्याग हेच कर्तव्य मानतात
कदाचित, म्हणून अश्रू गळतात

सांगा असतो का कधी मी माझा?
एका सामान्य माणसाची आत्मकविता-
सांगा असतो का कधी मी माझा?
----------------------
नाही नसतोच कधी मी माझा!
नाही नसतोच कधी मी माझा!

असतो मी शिक्षकांचा,
असतो जेव्हा शाळेमध्ये!
असतो मी सवंगडी अन भावंडांचा,
खेळतो जेव्हा अंगणामध्ये!
असतो मी बाॅसचा,
असतो जेव्हा आॅफिसमध्ये!
असतो मी कस्टमरचा,
असतो जेव्हा व्यवसायामध्ये!
असतो मी बायको मुलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी आई वडीलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी मित्रांचा,
बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!

असतो मी सैतानाचा,
करतो जेव्हा पापकृत्ये!
असतो मी देवाचा,
करतो जेव्हा पुण्यकर्मे!

सांगा मग जन्म ते मृत्यू या मध्ये
असतो का कधी मी माझा?
मृत्यूनंतर सुद्धा असतो मी
आठवणीत सर्वांच्या!

मग सांगा असतो का कधी मी माझा?
मग सांगा असतो का कधी मी माझा?

कधी सापडेल मला माझे,
हरवलेले मीपण?
की मीपणाच्या मनातसुद्धा,
बसलेले असेल दुसरेच कोण?
ते दुसरे कोण सुद्धा,
हरवून बसलेले असेल का त्याचे मीपण?

मीपण हरवलेले आपण सर्वजण,
एकाच वाटेवरचे प्रवासीगण!
चला मिळून शोधू हरवलेले मीपण
चला मिळून शोधू हरवलेले मीपण...

मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?
स्पृहा मलाही फुलावयाची असू नये का? 

जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही
कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

फुटून जाईल ऊर कोंडून ठेवल्याने
किमान डोळ्यांतुनी जखम भळभळू नये का? 

फिकट तरी जागतेपणी लावतेच कुंकू
निदान स्वप्नी सशक्त मळवट भरू नये का?            

असेल वर्षा ऋतू घरातील कोरडा जर
तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का?

उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे?
सजीव आलिंगनी फुलाने फळू नये का?   

किती करावे उपास-तापास मृण्मयीने?
अपूर्णतेला नियोग देखिल घडू नये का?
आठवणींचे बेसूर
आठवणींचे सूर  काही वेळेला
इतके  बेसूर असतात
की बऱ्याच वेळा
ते भेसूर होतात

मग रडण्याला गाणं
म्हंटलं जातच असं नाही
आणि गवयाच्या मुलाला
गायन येतच असं नाही

पण गाणं तयार व्हायला
हे पुरेसं आहे
नाहीतरी चिखल लागतोच
कमळ उगवायला

म्हणूनच हळुवार आठवणींचे
चुकून तरंग येतात कधी कधी
जीवनावर प्रेम करायला
तेवढेच पुरेसे होतात

आठवणींची दलदल
खोल खोल असते
तळाशी मात्र तिच्या
नेहमीच मळमळ असते

तुम्हाला काय वाटतं ?
दलदल, मळमळ , तरंग
सारखेच आहेत ........?
का एकाच दलदलीची ती
अनेक रुपे आहेत .........?

ऋणानुबंध
तुटून जातील जीवन पटलावरील धागे
सुटून जातील धाग्यांनी गुंतविलेली माणसं
पण एक ऋणानुबंध कधीच  तुटणार नाही
जो तुझ्याशी आहे, जो तुझ्यामुळं आहे
कसा घडला माहित नाही
कधी घडला माहित नाही
बस एवढाच पूर्ण विश्वास
आहे केवळ तुझ्यावरती 
जीवनाचा संग सुटला तरी
तुझ्या प्रेमाचा ऋणानुबंध कधी सुटणार नाही

प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...
प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...
कुणी त्याला स्वप्न म्हणून गोंजारतं
कुणी त्याला ध्येय म्हणून बाळगतं
कुणी त्याला आशेनं जोपासतं
कुणी नाइलाजानं पाठपुरावा करतं...

शेवटी वेड ते वेडच राहतं...
त्यानं काही साध्य होत नाही
पण ते चालणाऱ्या माणसाची सोबत करतं;
त्याला चालण्याची शक्ती देतं
म्हणून माणूस चालत राहतो...

प्रत्येकजण आपापलं वेड घेऊन चालत आहे...
हे बरंच आहे; नाहीतर
प्रत्येक जण उरेल एकाकी वा थकलेला...
शहाणपण माणसाची शक्ती किंवा सोबत नाही ठरत

अजुनी बसून आहे
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..
मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..
का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..
हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..
अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........

बांद्रा स्टेशन बाहेर.....
माणसांची गर्दी
भोंगातील आवाज
श्रद्धेने रस्त्यावर
चाललेले नमाज
रंग बिरंगी डिश
ठेवलेले सजून
गरम मसाल्यांचे
गंधीत वातावरण
कडक बंदोबस्त
सावध खाकीधारी
इवल्या शेरवानीत
मुले गोरी गोरी
हिरव्या पताका
सुरमी नजरा
कर्मठ गंभीर
अल्ला हू चा नारा
नवे कोरे बुरखे
उत्साहाने भरले
बाजरी गढलेले
हात मेहंदी सजले
आलो मज वाटे
दुसऱ्या जगात
बसलो अवघे
कौतुकाने पाहत
गीत (सांज)
(तोः ) साथ सांजेस त्या पाहिले रंग ते, लेवुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?
(तीः) सांजवाऱ्याप्रमाणे मला स्पर्शण्या, धावुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तीः) ते क्षणांचे सखे! रंग विरतात ना...
(तोः ) पण स्मृती होउनी रंग उरतात ना!
तू मनाला तुझ्या हे पुनः आज समजावुनी , सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तोः ) वागतो स्वैर वारा किती नेहमी
(तीः) मुक्त चैतन्य तो, काय त्याला कमी?
तू स्वतःला जरा एवढे आज उंचावुनी, सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?
तुझ्या हास्याचे तुषार ...
तू थकलेल्या मनाने
डोळ्यात सांज ओढून
दु:खाच्या काठावरती
जेव्हा असते बसून
लाख वेळा मनी माझ्या
विचार येती दाटून
द्यावा तुजला आधार
केवळ तुझा होवून
तू हसावे झऱ्यागत
मुग्धपणे खळाळून
तुझ्या हास्याचे तुषार
अन मी घ्यावे झेलून
रोजचे झाले
चांदण्याचे हे इशारे रोजचे झाले
आणि मेघांचे पहारे रोजचे झाले!
भेटले वाटेत, वा दारी, घरी आले
दुःख या ना त्या प्रकारे रोजचे झाले
सतत वरवर शांत दिसणाऱ्याच आकाशी
वादळांचे येरझारे रोजचे झाले!....
नेहमी हळुवार तो स्पर्शून जातो, पण-
गार वाऱ्याचे शहारे रोजचे झाले...
वेगळी भासे जगाला का कथा माझी?
विषय, घटना, पात्र - सारे रोजचे झाले!

खरच मी स्वप्नाला भितो
खरच मी स्वप्नाला  भितो
जर मी स्वप्नात गेलो
अन तू तिथे नसलीस तर
या कल्पनेनेच हवालदिल होतो
त्या विराण दुनियेला घाबरतो
खरच मी स्वप्नाला भितो

अन कदाचित जर
त्या स्वप्नात तू माझी नसलीस तर
अन्य  कुणाच्या गळ्यातील
हार झाली असशील तर
किती जरी थकलो तरी
डोळ्याला माझ्या डोळा न लागतो
खरच मी स्वप्नाला भितो

स्वप्न हाती कधीच नसते
नकोसे तर हमखास दिसते 
तुला गमावणे मी साहू न शकतो
स्वप्नातही दु:ख ते पेलू न शकतो
खरच मी स्वप्नाला भितो

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)
(चाल -  या डोळयांची दोन पाखरे ..)

त्या गेंड्याची दोन पावले,
फिरतील तुमच्या भवती -
पाठलाग ती सदैव करतील,
फक्त मताच्यासाठी .....

वर्तन तुमचे, हात असे हो
त्या गेंड्याचा थारा
सहवासातून हवाच त्याला,
नित्यच तुमचा नारा  
तुमचा परिचय त्यास हो आंदण,
बिलकुल मताचसाठी ..   

भाव देतही असतील काही,
पैसा अडक्यातुनी
एका मताचसाठी तुमचे
धरतील कर दोन्ही     
आहेत डोळे, क्षणैक प्रीती,
ते तर खुर्चीवरती .. 

पत्र
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो...
आधी विषय सुचत नव्हता
मग वेळ मिळत नव्हता
शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय
आणि आळस-
अशा एक ना अनेक सबबी...

पूर्वी पत्रांना गंध असायचा
आणि अक्षरांत ओलावा
न लिहिलेला मजकूरही दिसायचा
लिहिणार्याचा चेहरा
आणि बोलण्याचा आवाज
वाचता-वाचता उमटायचा...

इतकंच कशाला;
ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं
वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं
पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा...

खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं
वेळ, कागद, पेन काढणं
स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं
आणि खाडाखोड झाल्यावर
किंवा चुकीचं लिहिल्यावर
फाडाफाडी करणं..
इतकं करून झालंच लिहून
तर पाकीट, तिकीट आणि पत्ता
या सोपस्कारांतून पेटीपर्यंत पोचवणं
पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं...

पण पत्र 'पत्र' होतं
टेक्स्ट मेसेज किंवा मेल नव्हतं
जसा फोटो आणि पोर्ट्रेटमधे फरक असतो-
फोटो एखाद्या व्यक्तीचा क्षणिक चेहरा दाखवतो
तर पोर्ट्रेट तिचा जीवनपट उलगडतो, तसा....

पत्रात एक जाणिव होती,जबाबदारी होती
उत्सुकता आणि आतुरता होती
दूर असलेल्या व्यक्तींमधला
दुरावा मिटवायची क्षमता होती...

एक जुनं रायटिंग पॅड सापडलं
तेव्हा लक्षात आलं की
या पॅडला जो 'फील' आहे
तो 'टचपॅड'ला नाही...

शेवटी हेच एक कारण किंवा निमित्त मिळालं
तुला हे पत्र लिहायला;
नाहीतर आता पोस्टखात्याच्या (तारेप्रमाणे) पत्रसेवा बंद करायच्या
जाहीर निवेदनाचीच प्रतिक्षा आहे...

पैसा येतो आणिक जातो
पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

अबोल
प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

चेहऱ्यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे


मेलेल्या वाटेला
आज मेलेल्या वाटेला
थोडे जावुनिया आलो
चार पावुले विषारी
जरा चालुनिया आलो
रक्त शिंपले तरीही
नच उगवले काही
अन ओघळण्या अश्रू
डोळे उरलेच नाही
प्राण जपावे कशाला
अर्थ नसे जगण्याला
उगा कुठेतरी पण
जीव आशेला टांगला
माझा उसवला श्वास
ठोके मोजतो अजून
लाल धमन्यात वाहे
जन्म आसक्ती तरुण

कडवट असतात काही क्षण
इतके कडवट असतात काही क्षण
कि उद्दिग्न विस्कळीत होते मन
अरे कश्यासाठी हे, का म्हणून ?
पिंजारात भणाणत असतात प्रश्न
अश्यावेळी जाते अवघेच भान हरवून
पायाखाली कळ्याही जातात चिरडून
अस्तित्वात उरून राहत आक्रंदण
जाणवून सारे संवेदना बधिरून
आपल्याच प्राणांचे ओझे वाटून
घेतो वार आपण स्वत:वर करून
सगळाच अर्थ छिन्नभिन्न होवून
उरत भरकटण पोकळ उदासवाण

गर्वानं सांगतो
काळ्या पदरावरती
घामाच्या मातकट रंगाने
हिरवंकंच चित्र रेखणारा मी
अजब रंगारी आहे
              गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
आसमानी - सुलतानीचे तीर
छातीत या रुतुनही
ताठ कण्यानं उभा राहणारा मी
पाणीदार असा सह्यगिरी आहे
            गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
मातीत राबताना
रक्त चेतवून
कष्टाचा धुप ओवाळणारा मी
श्रमदेवतेचा सच्चा पुजारी आहे
            गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
दाण्या-दाण्याला
मोताद असूनही
जगाला रसद
पुरवणारा मी
असा श्रीमंत सेवेकरी आहे
          गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे...!!!

बाँम्बस्फोट
कुठेतरी गुरफटत ओढत नेतय माझ मन मला
मनात फुटत असतात रोज अणू रेणु बाँम्ब ,
चिथड्या चिथड्या  शरीराच्याही रोजच होत असतात
हलकेच कधी गरम हवेत फुंकर घालावी अशी तिची कल्पना दिलासा देत असते अधे मधे
बाहेरच्या जगाची चिंता कधीच सोडलीय मी
कारण... माझ्यातच मी एक माझ जग बनवल आहे ,जे रोज बसत आणि उध्वस्त होत असत अचानाक
मीच नेतो मझ प्रेत रोज स्मशानात..,उध्वस्त अग्नीत उध्वस्त  मी
एक दिवस यावा आणि बदलून टाकावे सर्व काही असे म्हणत म्हणत दिवस संपून गेलेत आणि बदलत गेले ते.....
ते फक्त जग माझ्या मनातले.. रोज सकाळ! दुपार ! संध्याकाळ!!!
आणि या जगात  एकटाच बाँम्बस्फोटाची दाह सहन करणारा मी,कुठला बदल शोधत असतो?????

दावण
लहानपणी माझ्या
यायच्या गावात
सात-आठ बैलजोड्या
विकायला
कधी खिल्लार
कधी माळवा, तर
कधी गीर जातीचे बैल
असायचे गावात
मुक्कामाला
होत गेलो जस जसा
मी मोठा
थांबलं त्यांचं असं येणं
मग मात्र होऊ लागलं
बाजारातून गुलालानं रंगून
त्यांचं गावात येणं
ट्रॅक्टर - ट्रेली, नांगर यंत्रांनी
लावलं त्यांनाही ग्रहण
घरा-घरातून होऊ लागलं
मातीच्या बैलांचं पुजन
दिसतात विरळाच आता
बैल, बांधल्या गव्हाणी
पण
दर गाव-खेड्यातून
दिसताहेत दावणी
बांधलीत ज्याला
माणसा सारखी माणसं
असो त्यांची कोणतीही चण
जात मात्र एकच
शेतकरी....!!!

शेती
शेती विषयी आता बोलावं काय ?
बोलण्यासारखं काही उरलंच नाही
कंठाशी आलेत प्राण तरीही
हिर्व स्वप्न पुन्हा पुन्हा पहाणं थांबलंच नाही
जुगारासारखी करतो आम्ही शेती
हुकमाचं पान कधी हाती लागलंच नाही
हाती कुणा-कुणाच्या राजे, राण्या, एक्के
सत्तेसाठी आमचं मात्र, जोकर होणं टळलंच नाही
काळ्या आईनं आमच्या , आम्हा कधी
भीक मागायला शिकवलंच नाही
आभाळीच्या पित्यानं, मात्र आम्हाला
सुखा-सुखी नांदवायचं ठरवलंच नाही
झिजली मातीत या, बापजाद्यांच्या हाडांची काडं
चंदनी व्रत ते आम्हा कधी चुकलंच नाही
सोडू म्हटलं तरी सुटत नाही पाश हा
अरे..!! शेतीला आम्ही कधी .... धंदा... मानलंच नाही.....!!!

तुकडे
न संपणारी  विस्कटलेली गोष्ट

लाल पायवाट
हिरवळीवर घट्ट धरून
बसलेलं जंगल
पावसाचे हेलकावे
ओढ्यांची घाई
पाखरांची लगलग
घरटी बांधण्याची
जगण्यासाठी एवढं पुरे
असं म्हंटलं तर
बुभुक्षित राहावं लागेल
म्हणून "  जगणं "
विचारात घ्यावं लागेल
केवढी ही सक्ती ......?
निसर्गापासून दूर राहण्याची

पर्यावरणाचा तोल वगैरे
सगळं कसं झूट आहे
निसर्गाचे उतारे स्वतःचे आहेत
पण माणसाला उत्तराची घाई आहे
म्हणून तर तो
स्वतःला " पर्यावरणवादी " म्हणवतो

कळणार कसं तुकड्यांमधून
पाहणार कसं त्यातून
पूर्ण प्रतिबिंब ......?
पूर्णतेचे स्वप्न ,
स्वप्नच राहते, स्वप्नच राहते.

मायावी श्रावण
मायावी श्रावण

रिमझीम तुषारांचा
मोर पिसारा फुलला
शुभ्र खडीचा मेखला
वसुंधरेनं घातला

असा जादुगार मास
अंधारात मोती सांडी
क्षणात फिरुनी ओपी
कांचनी थेंबांची हंडी

कुठे धुक्याची चादर
शामल डोंगर दरी
कधी ओलेत्या धरेला
रंगांची मेघ डंबरी

तरू शिखरं हेमांगी
धरतीला पाचू शेला
गोफ हर्षाचा गुंफीत
मायावी श्रावण आला

जीवन
ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात

नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात

येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्यावरी गाणे गाती मस्त मजेत

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास.
काजळ घातलेले डोळे
काजळ घातलेले
तुझे रेखीव डोळे
खुळ्या जीवाला
भूल पाडणारे
वेड्या मनाला
साद घालणारे
अगम्य कृष्णडोह
चांदण्यात भिजलेले

सारे काही विसरून
सारे काही हरवून
त्यात होवू पाहते
माझे जीवन  
आजन्म बंदिवान
अगदी स्वखुशीन

आता कुठलाही जुगाड
कुठलेही कांड
त्याला त्यातून दूर
जावू देणार नाही
तुझे काजळे
पुसून गेले तरीही

एवढीच अट
परतीची पायवाट
टाक पुसून
फेसबुकवरील प्रेम
आजकाल माझे इंटरनेट
फक्त फेसबुक झाले आहे 
आणि सारे फेसबुक
तुझ्याभोवती एकवटले आहे
लॉग ऑन केल्यावर
सर्वात आधी तुझा फोटो
त्या बाजूची हिरवी टिकली
दिसताच जीव हरखून जातो
तू हाय केलेला पहिला दिवस
तारीख वेळ ही याद आहे
स्माईली सकट तुझे सारे
उद्गार मला पाठ आहे ..

कधी कधी दिवसभर
खूप वेळा लॉगऑन करूनही
तू येवून गेल्याची
एकही खूण दिसत नाही
तुझ्या चॅट बॉक्स वर
मग ठेवतो काही लिहून
पुन्हा येतो पुन्हा पाहतो
अरे अजुनीही नॉट सिन
हिरमुसने तेव्हा मग 
माझे सारे अस्तित्व होते
अन तो दिवस ती रात्र 
माझे सदैव बिनसत राहते ...

तुझ्याशी मारलेल्या गप्पा
क्वचितच स्पेशल असतात
इकडचे तिकडचे विषय
उगाच मध्ये घुसत असतात
कधी काही सूचक लिहितो
तुझ्या Y ?? ने गडबडतो
सावरा सावर करीत मग
विषय काही बदलतो
तर कधी तुझ्या LOLZ 
शाबासकीने खुलून जातो
शब्द फुलांच्या वर्षावाने
तुला निशब्द करून टाकतो
वेळेचे भान हरवते
जेवणही राहून जाते
उमलून शब्दासमावेत
मन तुजशी एकरूप होते

फेसबुकने या विलक्षण
जादू नक्कीच केली आहे
माझ्या अबोल प्रेमाची
पेरणी काही झाली आहे
निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

श्रावणाची सर, चाळविते उर, हवा खट्याळ पदराला नेते दूर
वाजले कंगण की कोकिळेची कुहु, पैंजणाच्या सवेला मैनेचा सूर
चिमणी-पाखरू, हरिण-कोकरू, फेर धरी भोवताली  .... ॥२॥

आसक्त नजर तीक्ष्ण ती, 'अभय' बोलकी,  अधर अनिवार
खुणवती पापणी प्रिया, पाश द्यावया, बाहु अलवार
शोधीत भिरभीर, बघुनी दूरवर, मनीच पुलकित झाली .... ॥३॥
असा पाउस झडला
असा पाऊस झडला

असा पाऊस झडला
सह्यगिरी पान्हावला
कातळाच्या थानातुनी
लोट दुधाळ वाहिला

असा पाऊस झडला
झडे सरी वर सरी
न्हात्या-धुत्या धरेवरी
थेंब थेंब नाच करी

असा पाऊस झडला
आला गाभोळ रानाला
कोंब हिरव्या स्वप्नाचा
ओल्या मातीला लुचला

असा पाऊस झडला
झडे पानांतुनी मोती
गवताच्या पातीवर
हिरकण्या तेजाळती

असा पाऊस झडला
मोर उरात नाचला
बाल आठवांचा पुर
डोळ्या पुढूनी वाहिला

थेंबघुंगरु


थेंबघुंगरु घनात वाजे घुमड घनानी
चमकत राही अधुनि मधुनि दाही दिशातुनि

थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन

थेंबघुंगरु, चमकत पानी हिरवे होऊन
थेंबघुंगरु, सुंगध होते फुलाफुलातुन

थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन

थेंबघुंगरु, स्वैर निनादे कोसळताना
मल्हार घुमतसे, घनगंभीरसा धुंद तराणा

थेंबघुंगरु, तुटून आले सरसर खाली
गुंफून सरींच्या अगणित मिरवित रेशिमशाली

थेंबघुंगरु, सदा झुलतसे मनामनातुन
नाद तयाचा अखंड भुलवी.. कणाकणातुन

थेंबघुंगरु, ओघळती त्या नयनांमधुनी,
सांगून जात ती.. सुखदु:खाची कथा पुराणी

ओल....
मनी दाटता सय कोणाची
अंधारुन ते येते सारे
उगाच कुठले कारण नसता
आठवणींची वीज थरारे

चूक बरोबर होते का ते
जाऊनिया क्षण युगे लोटली
विचार आवर्ती सापडता
मेघगर्जना कानी घुमली

भळभळताना जखम उरींची
खोल वेदना चिरीत गेली
टपटपताना अश्रू सारे
विचित्रशी ती आर्त काहिली

नकोच ओझे आठवणींचे
नको लढा तो मनीमानसी
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....

आस ही मूर्त झाली
आस ही मूर्त झाली

ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती

घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी

नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली

फुलांनी उरी वाहिली आस सारी
फळांनी तिला गोमटी थोर केली
निसर्गातुनि येक आशा धुमारे
जळातूनि वाही फलद्रूप सारे


येड...
येड्यागत करायचा आबा कधी कधी...
चिडचिड करत पडवीम्होरं जायचा,
तावातावानं आभाळाकं हात नाचवत
म्हणायचा, 'पड की रं भाड्या एकदाचा'...

सवताचा बैल करून नांगारली जिमीन,
पोरांच्या ताटातलं काढून दाणं पेरलं...
समद्या दुन्नयेवर पसरलासाकी तू
तुझ्या डोळ्यानं नसंल का हेरलं?...
पड की रं भाड्या एकदाचा...

चावडीवरचा रेड्यो सांगत सुटायचा,
अमक्या राज्यात ढगफुटी,
तमक्या राज्यात पूर...
तापल्या सुर्व्यागत व्हायचा आबाचा नूर...
मग चप्पलच भिरकवायचा आभाळावर...
म्हणायचा, 'हांगं तिथंच घाल तुझी,
आमी हितं आमची घालतो...
तिथं ढगापल्याड लेका...
उरफाटाच कारभार चालतो'...

कोरड्या खोल हीरीच्या तळाशी
त्याला कायबी दिसायचं...
त्याचं हिरवं सपान बहुतेक
सुकून पडलेलं असायचं...
मग कसनुसा हासत म्हणायचा,
'पानी ह्येच जीवन...
पानी न्हाय तर....?

कधीकधी पिपळाच्या पारावर
दोर वळत बसायचा...
भुंड्या बोडक्या झाडाला बघत
परत कसनुसा हासायचा...
म्हणायचा,
'लेका, हीरीपेक्षा का नाय,
ह्यो पिपळंच बरा...
धा परस खोल जाऊन
माझं मढं आनायचा ताप
लेकरांनी कशाला करा...

मग परत आरोळी ठोकायचा,
'पड की भाड्या आतातरी...
का आता हे जिनंच गहान ठेऊ...
का ह्या दोरखांडाला लटकून...
ढगात जाब इचाराया येऊ...
पड की रं भाड्या,
का आता येऊ आभाळामधी?...

...शेवटी शेवटी
येड्यागत करायचा आबा कधीकधी


पावसाच्या सरी

कळंना तऱ्हा,
पावसाची अशीकशी
नको तेव्हा कोसळून
केली वाटमारी,
आता जणू मृगातही
भोगी कुठे अंधारी
आजा माझा सांगायाचा
गोष्ट पावसाची न्यारी,
होई सांगतांना त्याचा उर
ढग आषाढाचा भारी
सांगायाचा तो,
वळवा पासून ते चारी महिने
अशा झडायाच्या सरी,
असा गाळ गुडघाभर नि
असा भरुनी धावायाचा
वहाळ नि पाटचारी
मुश्किलीनं मोठ्या,
पडायाचो आम्ही दारी,
पेटवूनी कधी भुसा
बसायचो आम्ही घरी
ऐन पावसाळ्यात आता
जातो मी गारव्याला पारावरी,
आठवून गोष्ट आज्याची
मित्रांसंगे घेतो भिजुनी अंगभरी
परवा पोरानं माझ्या,
धरली माझ्या पुढं वही
म्हणे सांग निबंधासाठी
चार ओळी पावसावरी
हबकलो मी, गलबललो
दोन थेंब टपकन
पडले त्याच्या वहीवरी,
गडबडूनी विचारी तो
सांग डोळ्यांची का तुझ्या
तुंबली पाटचारी ?
बोललो दाटल्या कंठी मी
नाही रे पोरा नाही
याच आहे आता पावसाच्या सरी........!!!



मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

खडकू काही आले नाही
दवापाणी झाले नाही
गरिबीच्या सत्तेपुढं
डोकं काही चाले नाही
अंती मात्र देवच आला
प्राणज्योती घेऊन गेला ....

नियोजनपंडितांना भयावह क्षय आहे
पोशिंदा भयभीत; ऐद्यांना 'अभय' आहे
शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही!
शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?


वारी
झाला आज वारकरी
ज्ञाना, तुका, चोखा, गोरा
विठू नामाच्या गजरी
पाय चाले झरझरा

डोईवरी जनाईच्या
डुले तुळस साजिरी
टाळ, चिपळ्या, मृदंग
एका, नामा ताल धरी

पुष्पे सजली पालखी
दिंड्या, पताका, तोरण
वारू होउनी सावळा
धरी भक्तीचं रिंगण

झाल्या विठुमय दिंड्या
जयघोष हरी हरी
विठू सोडुनी पंढरी
करी भक्तांसंगे वारी.....!!!



सहवास........
तोडोनी नाळ उरिची , हृदय कठोर केली ,
जन-मनातील सारी  , नाती पुसून गेली .....
ठरवून ठेवतो दूर, त्या जुन्या आठवांना ,
परी , अचानकं येती डोळे पाणावूनीं .....
माध्यानं सरली अनं , आयुष्य उतारावरं ,
 बघतो वळून  , कोणी सादवेलं का मागुनी ....
गोष्टी  व्यावहारीक , न एकल्या कोणी ,
रुजलेली बिजे , कोणी घेतली परतोनि.....
उमजले उशीराचं  जरां , परी मी आनंदडोही ......,
प्रत्येक रक्तं-मांस पेशीत , सहवास तुझाच आई..............


॥ पंढरी ॥
विठूच्या राऊळी
नामाचा गजर
भक्तीचा सागर
भरलेला

संचारला त्यांच्या
अंगी पाडुरंग
मनात तरंग
भक्तीचे ते

कोण रुखमाई
कोणता विठ्ठल
कोण ओळखल
आज येथे

थाप मृदंगाची
घुमे वाळवंटी
नाम दाटे कंठी
भक्ताचिया

अद्वैताचा येथे
आला अनुभव
भक्ती चिरंजीव
विठ्ठलाची

धन्य झाले आता
देवा तन मन
दुःखाचे सरण
नको आता

) अरे पावसा पावसा २ ) टगेगिरी
अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा
आता कोठे दडलाशी
झोडपूनीया गारांनी
कारे अजुनी उपाशी

उंदीर- मांजराचा का ?
खेळ खेळशी आम्हाशी
आम्ही जातो जीवानिशी
तुझी दिसते बत्तिशी

तुझ्या रे अवकाळीने
आम्हा येई अवकळा
नातवांना काय सांगू
होता कसा पावसाळा ?....!!!


      २ ) टगेगिरी

रोज पावसाळी ढगांनी
आभाळ भरून येते,
उनाड वाऱ्याची टगेगिरी
त्याला उधळून लावते
पुन्हा आमची नजर
आभाळाचा वेध घेते,
तळपत्या सूर्याची धग
आमच्या स्वप्नांची राख करते
आमची काळी माउली
तावून सुलाखून लाल होते,
काळजांना आमच्या
आर्ततेचे चटके देते
फिरून पुन्हा नजर
वर जाते,
निराशेचं जहर भरून
पुन्हा जमिनीवर येते
काळजातल्या आमच्या घरांवरती
अवकाळीची वीज कोसळते
अन् ,
कळतही नाही केव्हा ?
माउली आमची
ओघळणाऱ्या आमच्या
मोत्यांना टिपून घेते.....!!!



मरे एक मुंगी

मागणे न माझे
तुज देणे घेणे
मरे एक मुंगी
इथे आणखी ही
भीतीची सावली
उन्हात जळावी
अशी इथली ही
रीत मुळी नाही
दु:ख दाटलेले
मनी खोचलेले
कधी कुणी दिले
ही तक्रार नाही
सुखांची उधारी
नवसांच्या दारी
कृती मज ऐसी
जमणार नाही
तुझे बरे चालो
इथे नि तिथे ही
असू देत मला
माझे जगणे ही


नथीचा आकडा
  नथीचा आकडा

काळ्या मातीत नांगर
असा फिरे कुंच्यावाणी
रंग हिरवा भरते
लालं काबाडाचं पाणी

रंग हिरवा हिरवा
नव्या नवरीचा चुडा
न्हातो घामाच्या अत्तरी
असा कुणबी रांगडा

भारी स्वप्नात दंगला
खुळा कुणबी रांगडा
घालू लक्ष्मीच्या नाकात
यंदा नथीचा आकडा

अशी कडाडली इज
गडी स्वप्नीच खपला
सुर्व्या भाळीचा तांबडा
कसा गारांनी विझला

              सुर्व्या भाळीचा तांबडा
              कसा गारांनी विझला........?????




जीवनखुणा...

कोण तू , जाणार कोठे ...
शोध का घेतो मनां ,
वासनांच्या जाळ्यातला ....
भ्रमर  तू जाण ना ,
घेशील किती गांभीर्याने ....
क्षणभंगुर जीवना ,
भेटले कित्येक , अजून भेटतील...
जपशील किती पाऊलखुणा ,
आप्त-मित्र , पुत्र-स्वकीय ...
प्रवासीच सारे , बांधसी किती बंधना,
मी न  म्हणतो कोणी मला कवी म्हणा ...
लेखिती मे उमजलेल्या जिवनखुणा .........



तू कापसाप्रमाणे झालास हल्ली टल्ली!
तू कापसाप्रमाणे झालास हल्ली टल्ली!
झालास का भुईला भलताच भार हल्ली?

देईल कुणी कशाला झोक्यास उगीच खांदा........
लावीत कोणी नाही तुज हिंग सुद्धा हल्ली!

होतात दोस्त कोणी, होतात यार कोणी........
चुकवायचे बिले हे नाना प्रकार हल्ली!

नाकारल्यावारीही होकार रोज येती........
मी मोजतो कुठे रे, माझेच पेग हल्ली?

बसण्या असायची ती तिन्हीसांज आजवरती.........
मन सांगते मला अन बसतो दुपारी हल्ली!

केली कृपा हॉटेलनी, झालीत ती दयाळू.........
मज देवूनी ती हात बाहेर नेती हल्ली!

मदिरा कशी म्हणावी? घनदाट लावतो ही......
पहिल्याप्रमाणे थोडक्यात होत नाही हल्ली!

इतके जगून झाले, डोळे मिटून बघतो........
माझे जिणेच झाले आहे टुकार हल्ली!

बांधू कसे कळेना धन दावणीस माझे..........
येती तसेच जाती भलतेच पैसे हल्ली!

बॉटल सिस्टीमिनी कुणी देत नाही आधीच्या!
टोचून फार बोल्ते राघूस मैना हल्ली!




विकास गड्यांनो विकास
हवी थोडी गर्दी मलाही
थोडी थोडी कुजबुजणारी
माझा गौरव करणारी
वल्गनांना दाद देणारी
नेता म्हणून मला मिरवणारी

रोज रोज करूनी श्राद्ध
माझ्याच परिस्थितीचे
मी काढतो वाभाडे
नवा भटजी रोज आणतो
रोज पिंड काकमुखी घालतो

त्यांचेही सरकार असते म्हणे
तेही टोप्या घालतात म्हणे
मोठमोठी झाडे धरतात
फांदीसाठी धडपडत बसतात

कुणीच मेले नाही तर स्वतःचेच
पोस्ट मॉर्टेम करतात
बाहेर आलेली आतडी
गळ्यात घालून म्हणतात
चला, भकासाचा विकास करू या.




अश्याच एका मदर्स डे ला
एक एक श्वासासाठी
आई धडपडत होती
ऑक्सिजन नळीतून
प्राण खेचीत होती

आणि पोरगा तर्रसा
बार मधून आलेला
लाल डोळे केस पिंजला
दारूमध्ये झिंगलेला
 
घाईघाईत तिच्या
सुवर्णकर्ण फुलाना
थबकला ना दुखता
ओढून काढतांना

अर्धवट ग्लानीत ती
मरणाच्या दारात ती
व्यर्थ प्रतिकार डोळी 
ओठी वेदनाच होती

त्या सोन्याची आता
दारूच होणार होती 
आईच्या डोळी गोष्ट
स्पष्ट दिसत होती

दुर्बल ती शब्दहीन
हातही हालत नव्हते
परि डोळ्यातील भाव
त्याला सांगत होते

निदान शांतपणे
अरे मरू दे..
मग घे रे ...
काय हवे ते..



नवा पुरोहित
असहायतेत तडफडणारा
माणूस जागा होत आहे
क्रोध हा विद्रोह होवून
आता उफाळत आहे
मेलेल्या डोळ्यात त्या
आगडोंब जळत आहे
त्या आगीत सुप्त सूड
वर्ग होवून वाढत आहे
शांती प्रेम अहिंसा
देवघरात मूर्तीत आहे
आग्रही गंभीर कट्टरता
गर्दीमध्ये मिरवत आहे
मोठमोठ्या घोषणा देत
ते आता सांगत आहे
आहोत आम्ही आहोत रे
लाऊडस्पीकर घुमत आहे
अमुक देव मानू नका
त्या प्रार्थना व्यर्थ आहे
तमुक पुजा करू नका
करणारेही धूर्त आहे
आग्रहाने शपथा वचने
दिल्या घेतल्या जात आहे
श्रद्धे वाचून धर्म जीवनी
पुन्हा परत येत आहे
एका पुरोहिताची जागा
आणि दुसरा घेत आहे
झुकण्यासाठी मस्तक
नवी जागा शोधत आहे



पॉवरफुल बाबा
गर्द भगव्या कपड्यातला
मोठी दाढी वाढवलेला
हिमालयी जावून आलेला
बाबा पॉवरफुल असतो
त्याचे मंत्र तयार शिजले
आशीर्वाद पक्के पिकले
घेतो दान जरी करोडो
परि धना कधी न शिवतो
आश्रम वासी तयार केले
घरदार ते सोडून आले
अष्टोप्रहर दिमतीला
मोठा फौजफाटा असतो
त्याचे फोटो त्याचे पुतळे
ताईत जडले अंगठी मधले
घरो घरी भक्तांच्या अन
मोठा देव्हाराही असतो
जागोजागी गल्लोगल्ली
शहरोशहरी गच्च भरले
या देशाचे भाग्य थोरले
रतीब यांचा कधी न सरतो


ट्राफिक
गोंधळ गदारोळ धावाधाव
प्रत्येकाला पुढं जायचं होतं
लागलेल्या सिग्नलशी
प्रत्येकाचं वैर होतं
इंचाइंचाने सरकणारे टायर
क्षणाक्षणाला ओकणारा धूर
क्लच ब्रेक एक्सलेटर
अन इंजिनचे गुरगुर
दचकून वैतागून चुकून
वाजणारे कर्कश हॉर्न
आवाजात विरघळणारी
एखाद शिवी कचकन
रस्त्यास नव्हती उसंत
अन गतीला अंत
माणसाचा शब्द ना
कुठला चेहरा जिवंत


तोच चेहरा
क्षणात सरले
सारे संचित
रित्या ओंजळी
रितेच भाकीत
श्वासामधले
प्राण जळले
मागे उरले
भास आंधळे
नकोत स्वप्ने
नकोच जळणे
असे असू दे
उदास जगणे
भिर भिरणारी
फुलपाखरे
चंद्र तारे ही
नको नको रे
तोच चेहरा
पुन्हा पुन्हा
अलभ्य तरीही
पुसता पुसेना


भरल्या पोटाची कविता
भरलेल्या पोटानं
लिहतोय कविता
"भुकेने जळल्या
कलिका लता"
शांत निवांत
लोडला टेकून
एसीचे तापमान
योग्य राखून
शब्दाचा परिणाम
यमक विचार
आठवतो कुठली
उपमा चमकदार
ठरवले असते
कविता लिहल्यावर
मॉलला चक्कर
दुपारचा पिक्चर
आणि आल्यावर
लाईकवर नजर
थँक्स धन्यवाद
लाघवी उत्तर
तोवर तिकडे
जंगलात दूरवर
एका बळीची
पडतेच भर
वाचणारा अरे रे
लिह्णारा खरे रे
काही मिनीटातच
विसरती सारे


तमातून तमाकडे….
तमातून निघे
तमाकडे गाडे
प्रकाश तुकडे
पांघरुनी ||१
जगण्याचा भार
शीर्ण मनावर
सर्वांगी नकार
दाटलेला ||२
होते अगोदर
काय ते नंतर
भयाने अंतर
काजळले ||३
फुटक्या प्रार्थना
अतृप्त याचना
सजवुनी मना
निरर्थक ||४
असेल देहांत
जगताचा अंत
अजीर्ण वेदांत
होत असे ||५


जार फुलांचा गंध
ओढाळ पक्षाची
ओढाळ गाणी
ओढाळ गाण्यात
जीवाची राणी |
जीवाची राणी
दूरच्या गावी
एकल्या राती
झुरते मनी |
झुरते मनी
जळते पापणी
देहात वादळ
शिंपिते पाणी |
शिंपिते पाणी
विझेना वन्ही
कावरी बावरी
पाहता कुणी |
पाहता कुणी
खुलते कळी
भ्रमर मातला
धावतो वनी |
धावता  वनी
सुखाची धनी
गुपित दडते
हिरव्या रानी |
हिरव्या रानी
फुलते कुणी
जार फुलांचा
गंध होवुनी |
गंध होवुनी
निवता मनी
पुण्याची लंका
जाते जळूनी



एसएससी
वही पुस्तक हाती धर
पाठ कर पाठ कर
लिंग वचन मुहावरे
सब कुछ याद कर
चीन फ्रांस इंग्लंड
ध्यान दे साऱ्यावर
डोंट फरगेट एनेथिंग
फ्रॉम द ग्रामर
टीवीकडे पाहू नको
पीसीकडे जावू नको
एसएससी एसएससी
घोष असू दे कानावर
फार काही अवघड नाही
वेळा पत्रक तयार कर
क्लास लाव गाईड घे
झोपेला घाल आवर
मुसोलिनी हिटलर
यांच्याशी दोस्ती कर
भूमितीच्या वर्तुळात
रोज गर गर फिर
रोज स्पेलिंग घोकायची
सूत्र लिहून काढायची
स्कोर साठी फ्रेंचचा
पार चट्टामट्टा कर
आवडत नसले तरीही
सायन्सवर दे भर
मार्कस पुरत्या कविता
म्हणू नको दिवसभर
मुळी सुद्धा भांडू नको
चिडू नको रडू नको
एवढा पैसा खरच केला
पाडू नको तोंडावर
सदा टक्केस अंशी पडले
तू जा नव्वद टक्क्यावर
आईबापाची कीर्ती वाढव
नाव कोर ग्रीनकार्डवर
एका मागे एक विषय
कदम ताल आगे बढ
तास जाती तासावर
घाई कर वाच भरभर



वसंताची चाहुल
वसंताची चाहूल
पांघरते सृष्टी
चैत्रपालवीची झुल
ओढाळ मनाला लागते
वसंताची चाहूल
सृष्टी घालीते कानात
फुलांचे गे डुल
श्वासा-श्वासात रांगते
सुगंधाचे तान्हे मूल
कवळ्याकंचं हिर्वाईची
अशी पडे मना भुल
नसा-नसात पेटते
नव्या उमेदीची चूल
              नसा-नसात पेटते, नव्या उमेदीची चूल.....!!!



प्रीतीची पारंबी
रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा
झिंगून पिंगा घाली 'अभय' येरझारा
ऊर्मीच्या उन्नतीने उमेदी उसळते ॥


घाव कधीही
दुनियेला मी दावत नाही घाव कधीही
आणत नाही खोटा खोटा आव कधीही

माणुस मिळतो स्वस्तामध्धे, महाग वस्तू
राजकारणी कोठे बघतो भाव कधीही

किती असावी खोल मनाची जखम,दिलेली
मला न घेता आला याचा ठाव कधीही

प्रेम ,भावना ,मदत ,ऐकता, आपुलकी पण,
मला न दिसले स्वप्नांमधले गाव कधीही

नावानंतर तिच्या कुणाचे नाव असू दे
ना विसरावे तिने न माझे नाव कधीही


तुमच्या-आमच्यासठी कुणी......
आज आम्हा भारतीयांपुढे अनेक गहन प्रश्न उभे आहेत. आमच्या एका महान खेळाडूच्या हाताला झालेली दुखापत, आमच्या एका महानायकाला जडलेल्या व्याधी, एका नवीन गायकाच्या अवास्तव प्रसिद्धीचे राष्ट्रीय संकट, एक ना दोन. पण यावर चर्चा- वाद करायला लागणारा निवांतपणा, निर्धास्तपणा आम्हाला शक्य होतोय कारण, तुमच्या-आमच्यासाठी कुणी......
हाडामासाची तीही माणसे
त्यांनासुद्धा असते मन
सैनिक म्हणून देशासाठी
मग देतात तन-मन
बर्फ, थंडी, वादळवारा
वाळवंटाचा कधी निवारा
देशासाठी वाहती यांच्या
घामाच्या, रक्ताच्या धारा
बायका-पोरं, आई-बाप
चिंता, कधी आजार आहे
कधी तरी येणाऱ्या
पत्राचाच आधार आहे
तुमच्या-आमच्यासाठी असते
फक्त एक सीमारेषा
जीवन आणि मृत्यू सतत
तिथे बोलतात मूक भाषा
हातामध्ये शस्त्र आहे
मनामध्ये निष्ठा सच्ची
ध्येय समोर स्पष्ट होताच
धूसर होतात कच्ची-बच्ची
युध्द फक्त घटना नसते
काळजामधली कळ असते
मृत्यूच्या पाचोळ्यासंगे
घोंघावणारे वादळ असते
कुठे आहे सुखाचा वारा,
कुठे चांदण्यांचे नभ आहे ?
तुमच्या-आमच्यासठी कुणी
सीमेवरती उभं आहे !



चैत्राची चाहूल
चैत्राची चाहूल


चैत्राची पालवी
तांबूस कोवळी
तप्त निखार्यात
शीतल साऊली

पळस पांगारा
फुलला भरारा
पावला भरुन
मनाचा गाभारा

शुभ्र रातराणी
मोगरा साजणी
खुळावले मन
सुगंध गगनी

रंग उधळण
मुक्त पखरण
पक्षीगण कंठी
चैतन्याचे गान

नील-लाल-पीत
पताका भरात
उभारल्या गुढ्या
हिरवी कनात

सृष्टीचे सृजन
फुटे पान पान
सोहळा देखणा
भरारले मन


लोकशाहीचा सांगावा
आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

पाच वर्ष जनतेची । करू शकेल का सेवा ।
पात्रता नी योग्यतेचा । नीट अदमास घ्यावा ॥

कुणी आला शुभ्रधारी । ढग पांघरुनी नवा ।
आत कलंक नाही ना । गतकाळ आठवावा ॥

कधी गाळला का घाम । त्याने मातीत राबून ।
स्वावलंबी की हरामी । थोडे घ्यावे विचारून ॥

पूर्ती केलेली नसेल । पूर्वी दिल्या वचनांची ।
द्यावे हाकलुनी त्यास । वाट दावा बाहेरची ॥

नको मिथ्या आश्वासने । बोला गंभीर म्हणावं ।
कशी संपेल गरिबी । याचं उत्तर मागावं ॥

कृषिप्रधान देशात । नाही शेतीचे ’धोरण’ ।
कच्च्या मालाच्या लुटीने । होते शेतीचे मरण ॥

शेती रक्षणाकरिता । नाही एकही कायदा ।
फुलतात घामावरी । ऐदी-बांडगुळे सदा ॥

शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥

सत्ता लोभापायी होतो । हायकमांडचा नंदी ।
प्रश्न शेतीचे मांडेना । करा त्यास गावबंदी ॥

पाचावर्षातुनी येते । संधी एकदा चालुनी ।
करा मताचा वापर । अस्त्र-शस्त्र समजुनी ॥

स्थिर मनाला करून । 'अभय' व्हा निग्रहाने ।
मग नोंदवावे मत । सारासार निश्चयाने ॥



गीत तिचे गातांना
दाही दिशांना मोद विहरतो गीत तिचे गातांना
अन अश्रुंचे घोट घोट मी गिळतो ती नसतांना

सायंकाळी समीप जेंव्हा ऐकाकीपण येते!
धावत येते सजणी माझी मिठीत मजला घेते

!! तिच असावी माझ्या सोबत जगताना मरताना !!

इतकी येते तिची नशा की तिलाच जग मी करतो
स्वप्नांमध्ये जगतो आणिक स्वप्नांमध्ये मरतो

!! असे वाटते जाग न यावी कधीच तिज बघतांना !!

आली होती परीसारखी परी सारखी गेली
आसवांत या तेंव्हा माझ्या दुनिया ही भिजलेली

!! मला पाहतो असेच आता कधीतरी हसतांना !!



पैसा ओत
पैसा ओत
पोरगी पटेल
बायको हसेल
सुख मिळेल |
पैसा ओत
छत मिळेल
फ्लश असेल
सुख कळेल |
पैसा ओत
पोर शिकेल
काम करेल
सुख मिळेल |
पैसा ओत
मोर्टीन जळेल
डास पळेल
सुख मिळेल |
पैसा ओत
रांग टळेल
वेळ वाचेल
देव दिसेल |


संगत

ना कधी भेटले कोणी
ना कधी हासले कोणी
पण रस्ता बदलला नाही
आजवरच्या जीवनात मी

जे कधी संगतीत होते
आज त्यांचे सरकले मुखवटे
आतल्या चेहऱ्यात त्यांच्या
खोल उदासी अन दुःख होते

चुचकारूनी त्यांना तरीही
आसरा दिला घरीही
सोडताना मात्र त्यांच्या
हृदयात गलबलले नाही

एकटाच आहे जरी मी
हासणे रडणे माझे स्वतःचे
आज त्याचे झाले गाणे
झाली भैरवी , नाही रडगाणे



सांजवातीस थांबला...
प्रवासी खिडकितून मागे वळून पाहिलं...
आणि देखणं त्याचं रुपडं मनाला भावलं,
घुंगुरवाळे केश, काळेभोर नेत्र ....
खुदकनं हसला त्यातुन श्रीकृष्ण ,
दूर कुठं शिळं पाव्याची वाजली....
कोण्या घंटानादाने जोड त्याला दिली,
मंद, थंड झुळुक अंगावरून सरली...
स्थिरावलं चित्तं , कायाहीन झाली ,
वळले नेत्र आकाशी, सुर्यप्रभा झाकाळली....
मेघवर्ण , घनश्याम डोकावला त्यातुनी ,
जाहल्या तिन्हिसांजा , भारी लगबग झाली....
सांजवातीला थांबला, वृंदावनी चक्रपाणी ............



श्रीज्ञानेश्वरी गौरव
श्री ज्ञानेश्वरी गौरव

प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||

स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||

दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||

भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||

शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||

ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||

उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||

शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||

भाषा मराठीसी | चैतन्याचे देणे | सात्विकाचे लेणे | लेवविले || ९ ||

चित्त अनायासे | लाभे विश्रामता | ऐकिता वाचिता | एक ओवी || १० ||

वसू दे वाणीत | नित्य ज्ञानदेवी | हेचि कृपा व्हावी | माऊलीची || ११ ||


आज चवताळली माझी भूक आहे
आज चवताळली माझी भूक आहे
सुरुवात कुठून करावी अज्ञात आहे

बोकाळले सर्वत्र राज्य ओरबाडण्याचे
मी कसे मागे राहावे प्रश्न आहे

"राज" कारण खुणाविते मज अकारण हे
तोड फोड वृत्तीस माझ्या आवतान  आहे

जो तो उठे आपुलाच झेंडा धरूनी हाती
माझ्या मुखीचा आविष्कार आता निः शब्द आहे

उलटीच गंगा धावते हिमालयाकडे
सागरही कोरडा पडे निमूटपणे

रोजचीच वणवण करुनही खादाखाद आहे
तान्हुल्यास दुधाची अन पाण्याचीही चणचण आहे

बळकावणे सोपे जहाले, पण मित्र नाही
एकलेच जवान सगळे पण मेजर नाही

झिंगण्यासाठी मदिरेचीही गरज नाही
राजकारण, धर्म, अधर्म पुरे मज विस्मृतीसाठी

कोण ऐकणार माझे गदारोळात साऱ्या
दुर्योधनाने गिळिले आज भीमरायाला




सूर्य थकला आहे
पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई
अनुतापे बुजवत न्यावी
'अभय'तेचे एकेक एकक
ठिणगी शोधत आहे
अनर्जितांच्या पाडावाला
शिक्षा योजत आहे!
श्रमदेवाच्या उत्थानास्तव
शिक्षा योजत आहे!!



वेगळा
कालचा चंद्र जरासा
वेगळा वाटला म्हणून
जवळ जाऊन निरखून पाहिल्यावर
कळलं की
त्याच्यावर खालच्या बाजूला
बारीक अक्षरात
'एक्सपायरी डेट' छापलेली आहे
आणि त्याखाली
'मेड इन चायना'....




बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या......
बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या......
फडताळांची झुरळे सुद्धा पडली मागे मागे त्यांच्या!

एक काफिला तो भ्याडांचा खुराड्यामधे चिवचिव करतो!
कुणी खास तोतया त्यांस मग, अनाहूत सल्लेही देतो!!

दूर, दूरवर ज्यांचे काही सोयर नाही कवितेशी ते......
पांघरून भरजरी झूल, बसलेले दिसले झिपरे मज ते!

जन्मजात ते भाटच होते, काय अपेक्षा त्यांच्याकडुनी?
हातामध्ये घेत तुणतुणे वळवळती ते अधुनी मधुनी!

कुटाळक्या करतात, बिळातच खुडबुड करती शानदार ते!
असे वाटते त्यांना की, गर्जनाच करती धारदार ते!!

पुकारती दुसऱ्या भ्याडांना, तेही जमती हळूहळू मग!
एक कळप भ्याडांचा जमतो, टाळ्या पिटतो, घाबरून मग!

मखरांमधली मानाची मग काही नावे दिसू लागली.....
प्रशस्तीपत्रक वाटायाला हळूच तीही पुढे जाहली!

एक खुजा जन्माचा, करतो पुरस्कार जाहीर खुजांचा!
निवडसमीती  ठरते घ्याया शोध अशा त्या मानकऱ्यांचा!!

संपायाची भीती ज्यांना तेच लढे उरण्याचे करती!
गझल एकही खणखणीत ना कोणाच्याही नावावरती!!

अशा घोषणा, अशी बुराई, करून का मोठेपण येते?
गनिमी काव्याने का कोणा सरस्वती रे प्रसन्न होते?

डोळ्यांना लावून झापडे, झोपेचे ते सोंग वठवती!
कशास डोकेफोड करावी, उठवायाला सोंगांना मी?

चला येथुनी निघून जाऊ, कळपांना का, कुणी विचारे?
रक्त आटवू कशास माझे, अशामुळे का कुणी सुधारे?

2 comments: