पुणे : जिल्ह्यातील महसूल विभागाने ‘झीरो पेंडन्सी’चे काम प्रभावीपणे केले आहे. झीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे, मात्र यापुढे कामासाठी येणाऱ्या लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते तातडीने सोडविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज केली.
येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुणे जिल्ह्यातील झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, झीरो पेंडन्सी अंमलबजावणीच्या जिल्ह्याच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी निलीमा धायगुडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
श्री.चंद्रकांत दळवी म्हणाले, झीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे यापुढे कामाचा ताण कमी होणार आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागतील. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातीत महसूल विभागात झीरो पेंडन्सी होणार आहे. हा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी डेली डिस्पोजलचे कामही वेगाने आणि सातत्याने होणे आवश्यक आहे. या कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सामान्य लोकांनाही शासनाच्या आणि प्रशासनाच्या प्रती आदर निर्माण होणार आहे, ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
बारामती तहसिल कार्यालय आदर्श
झीरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच आपले कार्यालय आणि परिसर स्वच्छ व निटनेटके ठेवणे आवश्यक आहे. काम करताना वातारण प्रसन्न असणे महत्वाचे असते. बारामती तहसिल कार्यालय व परिसर निटनेटका आणि स्वच्छ आहे. हे कार्यालय आदर्श असून इतर कार्यालयांनीही याचा आदर्श घेण्याचे आवाहन श्री.दळवी यांनी यावेळी केले.
‘कोसला’कारांचे आभाराचे पत्र
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कोसलाकार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या पुण्यातील फ्लॅटच्या नोंदणीचे काम अनेक वर्ष रखडले होते. झीरो पेंडन्सी अभियानामुळे हे काम अत्यंत कमी वेळेत झाले. प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलामुळे प्रभावीत झालेल्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एक पत्र लिहून विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे आभार मानले आहेत, तसेच या झीरो पेंडन्सी अभियानाचे कौतुक केले आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभाग, तहसिल कार्यालयांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला, तसेच हे अभियान राबविताना आलेले अनुभव सांगितले.
source:महान्यूज
No comments:
Post a Comment