तिरंगा
स्वातंत्र्य दिनाला तिरंगा
डौलाने फडफडत होता
त्याला बघून एक बालक
ढसाढसा रडत होता
तिरंग्यातिल हिरवा रंग
जेव्हा त्याच्या नजरेपुढे आला
म्हणे अशाच हिरव्या शेतासाठी
माझा आबा फाशी घेऊन मेला
केशरी रंगाकडे ते लेकरू
केविलवाणं पाहत होत
म्हणे माझ्या शहिद बापाचं रक्त
असच तर वाहत होत
जेव्हा त्याची नजर
गेली पांढऱ्या रंगावर
म्हणे असेच कपडे असतात हल्ली माझ्या विधवा आईच्या अंगावर
झेंड्याच्या दांड्यात त्याला
दिसली थकलेल्या आजीची काठी
तेव्हा तो गुरूजींना म्हणाला
गुरूजी स्वातंत्र्य तर मिळालय हो
पण कुणासाठी ? अन कशासाठी ?
शांततेचं प्रतिक म्हणजे
अशोकचक्राचा निळा रंग आहे
मग जाती धर्माच्या नावावर
का वातावरण तंग आहे ?
आजोबा आणि बापाच्या मृत्यूनंतर
मला हल्ली एवढंच कळत
मेल्यानंतर ह्या देशात
फक्त मौन दोन मिनिटांच मिळतं
गुरूजी बिचारे शांत होते
तरीही त्याने दिला नारा
सारे जहाँ से अच्छा
हिंदोस्ताँ हमारा !
हिंदोस्ताँ हमारा
No comments:
Post a Comment